बदलापूरः शहरात पडणारा पाऊस आणि त्यानुसार पावसाळी पाणी वाहून जाण्याची सक्षम व्यवस्था उभारली नसल्याने कल्याण बदलापूर राज्यमार्ग अंबरनाथमध्ये दररोज तुंबतो आहे. बुधवारीही सकाळी साडे दहाच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसानंतर कल्याण बदलापूर राज्यमार्गावर अंबरनाथ पश्चिमेतील पोलीस ठाणे विमको नाका दरम्यान तुंबला. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक दुचाकीस्वार गाडी बंद पडल्याने संतापले होते. तर वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहनचालकांच संतापाचे वातावरण होते.
हेही वाचा >>> ठाणे पूर्वऐवजी पश्चिम स्थानकातून होणार टीएमटी बसगाड्यांची वाहतूक, सॅटिसच्या कामामुळे महिनाभर बस वाहतूक मार्गात बदल
अंबरनाथ शहरातील सांडपाणी व्यवस्था आणि शहरात तयार करण्यात आलेल्या रस्ते तसेच नाल्यांची क्षमता यांचे विषम प्रमाण असल्याचे गेल्याच आठवड्यात पडलेल्या जोरदार पावसात समोर आले होते. गेल्या आठवड्यात अंबरनाथ शहरातील महत्वाचे रस्ते, मार्ग पाण्याखाली गेले होते. कल्याण बदलापूर राज्यमार्गावर अंबरनाथ पोलीस ठाणे ते विमको नाका भागात पाणी साचले होते. पूर्वेतील बी केबिन रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे आसपासच्या घरात पाणी शिरले होते. तर त्याचवेळी याच पाण्यामुळे शेजारच्या रेल्वे रूळांवर पाणी वाहू लागले होते. त्यामुळे बदलापूर ते मुंबई रेल्वे सेवा दिवसभरासाठी ठप्प झाली होती. त्यामुळे शहरातील सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा कुचकामी असल्याचे दिसून आले होते. गेल्या काही दिवसांपासून कल्याण बदलापूर राज्यमार्ग विविध भागात पाण्याखाली जातो आहे.
हेही वाचा >>> कळवा रुग्णालयातील रुग्णांचे हाल ; वातानुकूलीत यंत्रणेतील बिघाडामुळे चार शस्त्रक्रीया विभाग बंद
अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या या मार्गावर चिखलोली भागातही पाणी साचते आहे. या भागात नालेच उभारले नसल्याचे समोर आले आहे. तर अंबरनाथ पोलीस ठाणे ते विमको नाका या भागात नाले अरूंद असल्याने पाणी साचते आहे. या भागात पाण्याचा निचरा होत नसल्याचे समोर आले आहे. बुधवारीही सकाळी अंबरनाथमध्ये जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे या मार्गावर पुन्हा पाणी साचले. त्यामुळे दोन्ही दिशांची वाहतूक ठप्प झाली. एक ते दीड फुटांपर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे रिक्षा आणि दुकाची बंद पडू लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालक संताप व्यक्त करत होते. गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने या मार्गावर पाणी साचत असल्याने वाहनचालकांत संतापाचे वातावरण आहे. पाणी साचल्यानंतर येथून नागरिकांना पायी जाणे कठीण होते आहे. चालण्यासाठी हा मार्गच बंद होत असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडते आहे.
नाल्यात सेवा वाहिन्या
या राज्यमार्गाच्या उभारणीवेळी जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या स्थलांतरीत करण्यात आल्या नाहीत. त्यात काही वाहिन्या थेट नाल्यात टाकण्यात आल्या. या नाल्यात कचरा अडकत असल्याने पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने आणि सदोष नालेसफाईमुळे हे पाणी साचत असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.