Kalyan Crime : बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता अशाच प्रकारची एक घटना कल्याणमध्ये घडली आहे. एका १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. त्याआधी तिचं अपहरण करण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे.

नेमकी काय घटना घडली?

२३ डिसेंबरच्या संध्याकाळी १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी आईकडून २० रुपये घेऊन खाऊ आणायला गेली होती. त्यावेळी ती घरी परतली नाही. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांनी तिची शोधाशोध सुरु केली. मात्र तिचा काहीही पत्ता लागला नाही. मुलीच्या पालकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. ज्यानंतर पोलीस या मुलीचा शोध घेत होते. २४ डिसेंबरला पोलिसांना कल्याणजवळच्या बापगाव या ठिकाणी अल्पवयीन मुलीचा मृतदेह फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आला. हा मृतदेह जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. ज्यानंतर ही बाब समोर आली की मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे. या घटनेच्या विरोधात कल्याणच्या नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पोलिसांनी याबद्दल काय सांगितलं?

कल्याण पूर्व भागातल्या कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. काल एका आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर शेगावहून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी आम्ही करतो आहोत. मुलीच्या अपहरणासाठी रिक्षाही वापरण्यात आली आहे. ती रिक्षाही आम्ही जप्त केली आहे. आरोपीचं नाव विशाल गवळी आहे. त्याच्यावर मालमत्तेच्या अफरातफरीचे काही गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. जे काही अँगल समोर येतील ते आम्ही तपासतो आहोत. असं डीसीपी अतुल झेंडे यांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याणमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला

माणुसकीला काळीमा फासणारी घटना कल्याणमध्ये घडली आहे. ज्या आरोपीने अत्याचार केले आणि मुलीची हत्या केली त्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे. फाशीची शिक्षा या आरोपीला द्या किंवा बदलापूरच्या आरोपीचं जसं एन्काऊंटर केलं तसं एन्काऊंटर केलं जावं अशी अपेक्षा आहे. सदर आरोपीवर आधीचेही गुन्हे दाखल झाले आहेत. असं स्थानिक महेश गायकवाड यांनी सांगितलं. कल्याणमध्ये या घटनेचा निषेध नोंदवत मूक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी नागरिकांपैकी महेश गायकवाड यांनी ही प्रतिक्रिया दिली.