कल्याण – कल्याण डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा मंगळवारी (ता. ९) सकाळी १० ते संध्याकाळी पाच या वेळेत देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून बंद ठेवण्यात येणार आहे.

महावितरणकडून पालिकेच्या उल्हास नदी काठच्या उदंचन केंद्र, जलशुध्दीकरण केंद्रांना पाणी पुरवठा केला जातो. महावितरणकडून त्यांच्या कांबा येथील उपकेंद्रात काही देखभाल दुरुस्तीची कामे करायची आहेत. त्यामुळे पालिकेचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहे, असे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी सांगितले.

या सात तासाच्या कालावधीत पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी पुरवठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. मागील तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत महावितरणकडून देखभाल दुरुस्तीची कामे काढण्यात आल्याने पालिकेला पाणी पुरवठा बंद ठेवावा लागला आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या १५० दशलक्ष लीटर मोहिली उदंचन केंद्र आणि या ठिकाणाहून नेतिवली टेकडीवरील जलशुध्दीकरण केंद्रात पाणी पुरवठा केंद्रात पाणी पुरवठा केला जातो. या दोन्ही केंद्रातून डोंबिवली शहराला पाणी पुरवठा केला जातो. उल्हास नदी काठच्या १०० दशलक्ष लीटर मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण ग्रामीण भागातील टिटवाळा परिसरातील गावांना पाणी पुरवठा केला जातो. मोहिली येथील दोन्ही उदंचन आणि जलशुध्दीकरण केंद्रांना कल्याण मुरबाड रस्त्यावरील टाटा पाॅवरच्या कांबा येथील उपकेंद्रातून विद्युत पुरवठा केला जातो. या उपकेंद्रातील एनआरसी-२ फीडरच्या देखभाल दुरुस्तीचे काम महावितरणला मंगळवारी करायचे आहे.

या विद्युत आणि तांत्रिक देखभाल दुरुस्तीच्या काळात पालिकेच्या उदंदन आणि जलशुध्दीकरण केंद्रांना पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याने महावितरणच्या विनंती अर्जावरून पालिकेने मंगळवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बारावे, मोहिली आणि नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण पूर्व आणि पश्चिम, कल्याण ग्रामीण भागातील टिटवाळा, मांडा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, कोळीवाडा, बंदरनगर आणि परिसरातील गावांना पाणी पुरवठा केला जातो. डोंबिवली शहराला नेतिवली जलशुध्दीकरण केंद्राला पाणी पुरवठा केला जातो. नेतिवली जलशुध्दीकरण केंद्रात मोहिली उदंचन केंद्रातून मंगळवारी पाणी येणार नाही. त्यामुळे मंगळवारी कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.