कल्याण : प्रदूषणकारी वाहनांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने प्रदूषण नियंत्रण वाहन तपासणी भरारी पथक तयार केले आहे. या पथकाने कल्याण, डोंबिवली, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर भागात करवाई करून मागील २० दिवसांच्या कालावधीत या पथकाने १३० हून अधिक वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांच्या नियंत्रणाखाली हे पथक कार्यरत आहे. उच्च न्यायालयाने हवा प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकांसह पोलीस, वाहतूक विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाला उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतून दररोज सुमारे अडीच ते तीन लाख वाहने विविध रस्त्यांवरून धावतात. अनेक वाहने जुनाट, आयुमर्यादा संपलेली, वाहनातील प्रदूषण नियंत्रण सयंत्रणा सुस्थितीत नसलेली, अशी वाहने चालविली जातात. अशा वाहनांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी दिले आहेत.

हेही वाचा : ठाणे : अंबरनाथ – बारवी रस्त्याचे शुक्लकाष्ठ संपणार, एमएमआरडीए, बांधकाम विभागाकडे हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु

कल्याण, डोंबिवली शहरांमधील सर्वाधिक वर्दळीचे रस्ते, चौक भागात रिक्षा, दुचाकी, मोटार, मालवाहू ट्रक, अवजड वाहने या तपासणीत तपासली जात आहेत. कल्याण मध्ये दुर्गाडी किल्ल्याजवळील दुर्गा माता चौक, खडकपाडा वाहतूक बेट, बिर्ला महाविद्यालय रस्ता, प्रेम ऑटो चौक, मुरबाड रस्ता, शिवाजी चौक, डोंबिवलीत घरडा सर्कल, मानपाडा रस्ता, शिळफाटा रस्ता, याशिवाय अंंबरनाथ, बदलापूर, भिवंडी परिसरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर वाहन तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे, असे कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांनी सांगितले.

या पथकाला एखाद्या वाहन चालकाने आपले वाहन प्रदूषण नियंत्रण सक्षम असल्याचे प्रमाणपत्र दाखविले. तरी या वाहनाविषयी तपासणी पथकाला संशय आला तर तात्काळ घटनास्थळीच पथकाजवळील पीयुसी (प्रदूषण नियंत्रण सयंत्र) सयंत्राव्दारे त्या वाहनाची तपासणी केली जाते. त्यात प्रदूषण होत असल्याचे दिसून आले तर त्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. तसेच त्यांनी प्रदूषण नियंत्रणाचे सक्षमता प्रमाणपत्र घेण्याची हमी दिल्यावरच त्यांना पुढील प्रवासासाठी परवानगी दिली जाते, असे साळवी यांनी सांगितले.

हेही वाचा : उमेदवार इच्छुक पण, मतदार उदासीन; पदवीधर निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातून केवळ १७ हजार नोंदणी

वाहतूक विभाग तपासणी

कल्याण वाहतूक विभागाने कल्याण वाहतूक हद्दीत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहन तपासणी सुरू केली आहे. दुर्गाडी किल्ल्याजवळील दुर्गा माता चौक, शिवाजी चौक, वर्दळीच्या रस्त्यांवर वाहन तपासणी केली जात आहे. पीयुसी सक्षमता प्रमाणपत्र या तपासणीत पाहिले जात आहे. हे प्रमाणपत्र नसलेल्या वाहन चालकांना दंड ठोठावला जात आहे, असे कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी सांगितले.

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात डेंग्यू – मलेरियाची साथ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हवा प्रदूषण नियंत्रणासाठी आरटीओ विभागाने एक स्वतंत्र तपासणी पथक तयार केले आहे. सर्व प्रकारच्या वाहनांची हे पथक तपासणी करत आहे. प्रदूषणकारी वाहनांवर तात्काळ कारवाई केली जात आहे. हवा गुणवत्ता वाढविण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.” – विनोद साळवी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण.