तुझ्या वाढदिवसाची मेजवानी जल्लोषात करू असे आपल्या भंगार विक्रेता मित्राला खोटे सांगून त्याला घरातून बाहेर बोलविले. त्याला तीन जणांनी एका रिक्षेत जबरदस्तीने बसवून त्याला नवी मुंबईतील खारघर येथे नेऊन त्याच्या जवळील मोबाईल, रोख पाच हजार रुपये काढून घेऊन त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अपहृताच्या कुटुंबीयांकडे मुलाला जिवंत पाहिजे असेल तर २० हजार रुपयांची खंडणीची मागणी केली. डोंबिवलीत आयरे गाव हद्दीत हा प्रकार घडला आहे.

रामनगर पोलीस ठाण्यात भंगार विक्रेता मुलाच्या तक्रारी वरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरू केला आहे. शनिवारी रात्री आठ ते रविवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान हा प्रकार डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव स्मशानभूमी रस्ता शिवा स्कॅप मार्ट ते नवी मुंबईतील खारघर दरम्यान घडला आहे.आकाश उर्फ शिवा ननकू राम (२४) असे भंगार विक्रेत्याचे नाव आहे. तो कोपर पूर्व रेल्वे स्थानका जवळील आई आशीर्वाद चाळ, पाटील कार्यालयाच्या मागे राहतो. जगू दिवाणे, संकेत गायकवाड, वांग्या पवार अशी आरोपी तरुणांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले, फियार्दी आकाश राम आणि तिन्ही आरोपी एकाच भागात राहत असल्याने एकमेकांना परिचित आहेत. आकाश भंगार विक्रीचा व्यवसाय करतो. त्यामुळे त्याच्या जवळ भरपूर पैसे आहेत असा आरोपींचा समज होता. आकाशचा वाढदिवस असल्याने आपण त्याच्याकडून मेजवानीच्या ना‌वाखाली पैसे उकळू असा कट आरोपी वांग्या, जगू आणि संकेत यांनी आखला. आरोपींनी आकाशला शनिवारी रात्री आठ वाजता घराबाहेर मोबाईल करुन बोलावून घेतले. मित्र बोलवितात म्हणून तो घराबाहेर आला. आरोपींनी आकाशला आपण तुझ्या वाढदिवसाची मेजवानी साजरी करू असे सांगू लागले. आकाशने त्यास नकार देऊ लागला. हे बोलणे सुरू असतानाच तिन्ही आरोपींनी आकाशला जबरदस्तीने एका रिक्षेत बसविले. आकाशने त्यास प्रतिकार केला पण आरोपींनी त्याला घट्ट पकडून ठेवले होते.

रिक्षेत बसल्यावर आकाशकडील मोबाईल, पाकिटातील पाच हजार रुपये आरोपींनी काढून घेतले. आकाश आरोपींच्या ताब्यातू सुटण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी वांग्याने आकाशला बंदुकीचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली. आपले अपहरण केले जात आहे याची जाणीव झाल्यावर आकाश घाबरला. त्याची आरोपीच्या तावडीतून सुटण्याची धडपड सुरू होती. आरोपी त्याला सोडत नव्हते. आरोपींनी रिक्षा सुसाट वेगाने नवी मुंबईतील खारघर भागात नेली. या भागात आकाशला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी, पट्टयाने बेदम मारहाण करण्यात आली. एकटाच असल्याने तो काही करू शकत नव्हता.

आकाशकडून वाढीव पैसे उकळण्यासाठी आरोपींनी आकाशला त्याच्याच मोबाईल वरुन आई, भावाला संपर्क करण्यास सांगून २० हजार रुपये देण्याची मागणी केली. है पैसे दिले नाहीत तर आरोपींनी आकाशला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. घडला प्रकार आकाशच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे सुरू केली. दरम्यानच्या काळात आरोपींनी आकाशला डोंबिवलीत आणून सोडून पलायन केले. रात्रभर आकाश आरोपींच्या ताब्यात होता.

पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. मौजमजा, झटपट श्रीमंत होण्यासाठी डोंबिवलीतील बेरोजगार तरुण एकत्र येऊन व्यावसायिकांचे अपहरण करत असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात डोंबिवलीतील एका फर्निचर विक्रेत्याचे ५० लाखाच्या खंडणीसाठी चार जणांनी अपहरण केले होते.