डोंबिवली : डोंंबिवली पश्चिमेत फेरीवाले, विक्रेते यांनी धुडगूस घातला आहे. या धुडगुसावर कारवाई करण्याऐवजी पालिका ह प्रभाग फेरीवाला हटाव पथकातील कामगार राजकीय आशीर्वादाने या धुडगुसाला पाठबळ देत आहेत. हे प्रकार सुरू असतानाच डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागातील एका नामचिन वडापावच्या दुकानातील चटणीमध्ये वडापाव खातना एका कष्टकरी महिलेला अळया आढळून आल्या. गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या दुकानावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
या कष्टकरी महिलेने याबाबतची तक्रार वडापाव विक्रेत्याकडे केली. पण त्याची दखल घेण्यात आली नाही. सामाजिक कार्यकर्त्या काशीबाई जाधव यांना हा प्रकार समजताच त्या डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात आल्या. त्यांनी कसारा भागातून दिवाळी निमित्त काही वस्तू विक्रीसाठी घेऊन आलेल्या महिलेची भेट घेतली. या महिलेने जवळील वडापाव आणि त्यामधील चटणी सामाजिक कार्यकर्त्या काशीबाई जाधव यांना दाखवली. त्यावेळी त्या चटणीमध्ये अळया असल्याचे आणि ती चटणी शिळी असल्याचे काशीबाई यांच्या निदर्शनास आले.
कसारा, खर्डी, शहापूर परिसरातून अनेक महिला दिवाळीनिमित्त विविध प्रकारच्या फुलांच्या माळा, आंब्याची पाने, केळीची पाने, झेंडु, आंबे फुलांची तोरणे विक्रीसाठी घेऊन येतात. या महिला दिवस, रात्र जंगलात कष्टाची कामे करून सणासुदीच्या दिवसात शहरी भागात वस्तू विक्रीसाठी नेल्या तर पैसे मिळतील म्हणून येतात. त्यांच्याजवळ जेवणाचा डबा नसतो. वडापाव खाऊन त्या दिवस काढतात, असे काशीबाई जाधव यांनी सांगितले.
कसारा भागातून एक महिला गुरुवारी सकाळी डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात फुलांची तोरणे विक्रीसाठी घेऊन आली आहे. दुपारच्या वेळेत त्यांनी रेल्वे स्थानकाजवळील एका प्रसिध्द वडापावच्या दुकानातून वडापाव खरेदी केला. वडापाव खात असताना त्यांना संशय आला म्हणून त्यांनी वडापाव हातात घेऊन पाहिले तर पावाला लावलेली चटणी शिळी आणि त्यावर अळ्या फिरत असल्याचे दिसले. या अळ्या पोटात जाऊन या कष्टकरी महिलेला काही इजा झाली असती तर त्याची जबाबदारी पालिका अधिकाऱ्यांनी घेतली असती का, असा प्रश्न काशीबाई यांनी केला.
काशीबाई यांनी त्या कष्टकरी महिलेला पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयात नेले. तेथे या कष्टकरी महिलेने वडापावमध्ये अळया असल्याची तक्रार केली. पालिकेच्या एका अधिकाऱ्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या दुकानदाराला समज दिली आणि त्या दुकानदाराचे शटर कारवाईसाठी बंद केले. अधिकारी निघून गेल्यावर दुकानदाराने पुन्हा दुकान उघडून वडापाव विक्री सुरू केली. अशाप्रकारचे वडापाव खाऊन कोणा नागरिकाला विषबाधा झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असे प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या काशीबाई यांनी केले. संबंधित वडापावच्या दुकानावर कारवाईची मागणी नागरिकांनी केली.