– सागर नरेकर

पाण्याच्या शोधात निघालेल्या बिबट्याने प्लास्टिकच्या पाण्याच्या भांड्यात तोंड घातले आणि त्या भांड्यात त्याचे डोके अडकल्याचा प्रकार बदलापूर जवळ समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर दोन दिवसांपासून या बिबट्याची सुटका करण्यासाठी त्याचा शोध घेतला जातो आहे. मात्र तो अजूनही हाती लागलेला नाही.

बदलापूर वनपरिक्षेत्रात बिबट्यांचा वावर सर्वश्रुत आहे. महिनाभरापूर्वी जुन्नर वनक्षेत्रातील रेडिओ कॉलर लावलेला बिबट्या अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या वेशीवर दोन ते तीन महिने वास्तव्यास होता. या काळात त्याने स्थानिकांच्या अनेक पाळीव प्राण्यांची शिकार केली. या काळात त्याचे ठिकाण रेडिओ कॉलरच्या मदतीने शोधले जात होते. मात्र अनेकदा अशा काही ठिकाणी शिकारी झाल्या होत्या ज्या ठिकाणी या जुन्नरच्या बिबट्याचा मार्गही नव्हता. त्यामुळे कल्याण आणि बदलापूर वनपरिक्षेत्रात दोन बिबटे असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

जुन्नरचा बिबट्या स्वगृही परतल्यानंतरही काही बिबट्याच्या काही हालचाली नोंदवल्या गेल्या होत्या. दोनच दिवसांपूर्वी बदलापूर जवळ काटई कर्जत राज्यमार्ग शेजारी असलेल्या गोरेगावजवळ एका निसर्ग पर्यटन केंद्र शेजारी बिबट्या वावरत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर एक चित्रफीत प्रसारित झाली. या चित्रफितीत बिबट्याचे डोके प्लास्टिकच्या पाण्याच्या भांड्यात अडकल्याचे स्पष्ट दिसून आले. भांडे काढण्यासाठी बिबट्या प्रयत्न करत असल्याचेही या चित्रफितीतून समोर आले. तहानलेल्या बिबट्या एखाद्या शेत घरावर पाण्याच्या शोधात गेला असावा आणि पाणी पीत असताना प्लास्टिकच्या या भांड्यात त्याचे डोके अडकले असावे असा अंदाज जिल्ह्याचे मानद वन संरक्षक अविनाश हरड यांनी व्यक्त केला आहे.

सोमवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे बचाव पथक, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, वन्यजीव संरक्षक यांच्या मदतीने आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने बिबट्याचा शोध घेत होते. मात्र दोन दिवसांनंतरही बिबट्या सापडलेला नाही. वनविभाग आणि वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांनी याबाबतची एक चित्रफीत प्रसारित केली आहे. त्याचे स्थान करताच संपर्क करावा असे आवाहनही या चित्रफितीतुन करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यटकांची बेफिकिरी प्राण्यांच्या जीवावर
वनपर्यटन, निसर्ग पर्यटन करण्यासाठी या जंगल भागाकडे येणाऱ्या पर्यटकांच्या बेजबाबदारपणा मुळे वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. अनेक मृत प्राण्यांच्या पायात अनेकदा काचा आढळून आल्या आहेत. तर मृत प्राणी-पक्ष्यांच्या पोटात प्लास्टिकचे आवरणही आढळली आहेत. अशाच बेजबाबदारपणाचा हा प्रकार झाला असून पर्यटकांच्या कचऱ्यामुळे हा प्रकार झाल्याचे दिसते आहे. – अविनाश हरड, मानद वन्यजीव संरक्षक, ठाणे.