डोंबिवली- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना एकाचवेळी बहुशाखीय शिक्षण घेण्याची, व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. आतापर्यंतच्या चाकोरीबध्द शिक्षणातून विद्यार्थ्यांची मुक्तता होणार आहे. विद्यार्थी जीवनात चांगला परिणाम घडवून आणणारा हा निर्णय असल्याने या धोरणाचा खूप प्रसार, प्रचार झाला पाहिजे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केले. हेही वाचा >>>‘आपलं कसं सगळं…’ एकनाथ शिंदे बोलत असतानाच कोणीतरी म्हणालं ‘बेधडक’, त्यावर ते म्हणाले “आमच्या फटाक्यांचा आवाज…” डोंबिवलीतील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या टिळकनगर कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी टिळकनगर शाळेच्या सभागृहात पार पडला. यावेळी इन्सस्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे विभाग प्रमुख डॉ. रवींद्र कुलकर्णी, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रा. अजय भामरे, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप घरत, कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी, प्राचार्य नारायण फडके, कार्यवाह आशीर्वाद बोंद्रे, अर्चना जोशी, सोमय्या महाविद्यालयाच्या रजीस्ट्रार प्रियांका जोगळेकर उपस्थित होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू होत असतानाच टिळकनगर संस्थेने वाणीज्य महाविद्यालय सुरू केले आहे. विद्यार्थी भवितव्याच्या दृष्टीने हा चांगला योग जुळून आला आहे. प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या क्रमिक अभ्यासक्रमा बरोबर तो व्यावसायिक अभ्यासात पारंगत असेल अशी व्यवस्था नवीन शैक्षणिक धोरणात आहे. बहुआयामी असे हे शिक्षण विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसायासाठी मोलाची मदत करणार आहे. परंतु जे चांगले असते त्याचे कौतुक करणारे कमी आणि विरोधी बोलणारे अधिक असतात. तसे या धोरणाच्या बाबतीत होण्याची शक्यता असल्याने शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक संस्था, शिक्षकांनी या धोरणाविषयी अधिक चांगला प्रचार, प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले. हेही वाचा >>>शरद पोंक्षेंनी CM एकनाथ शिंदेंसमोर काढली बाळासाहेबांची आठवण, ‘त्या’ अग्रलेखाची आठवण करुन देत म्हणाले “ती शिवसेना…” ‘काही शैक्षणिक संस्था स्वविकासाकडे अधिक झुकलेल्या असतात. या पार्श्वभूमीवर टिळकनगर शाळेने विद्यार्थी केंद्री राहून आपल्या शाळेचे मराठी पण टिकून ठेवून महत्वाची भूमिका बजावली आहे. एका शैक्षणिक छताखाली विद्यार्थ्यांना सर्वांगीण, परिपूर्ण शिक्षण मिळेल यादृष्टीने संस्थेचे कार्यवाह आशीर्वाद बोंद्रे यांचे सुरू असलेले प्रयत्न खूप कौतुकास्पद आहेत,’ असे मंत्री चव्हाण म्हणाले. ‘मुलांना इयत्ता आठवीपासून ते व्यावसायिक शिक्षणापर्यंत जोडण्याचे काम नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. नवीन महाविद्यालयांना या धोरणाची अंमलबजावणी करताना सोपी वाट असणार आहे. जुन्या महाविद्यालयांना काही आव्हानात्मक, बदल स्वीकारुन या धोरणाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. महाविद्यालयांनी एकावेळी परिसरातील अनेक शिक्षण संस्थांशी संलग्नता करुन विद्यार्थ्यांना बहुद्देशीय शाखा शिक्षण पध्दतीचा लाभ घेता येईल यादृष्टीने प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे, असे उद्घाटक डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. तळागाळातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. त्याला स्थानिक पातळीवर बहुउद्देशीय शिक्षणाचा लाभ घेता आला पाहिजे यासाठीचे संस्थेचे प्रयत्न आहेत. परदेशी भाषांबरोबर संस्कृत भाषेचे वर्ग सुरू करण्याचा संस्था विचार करत आहे, असे अध्यक्ष घरत यांनी सांगितले. टिळकनगर संस्था राबवित असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती कार्यवाह बोंद्रे यांनी दिली. स्वाती मेहेंदळे यांनी सूत्रसंचालन केले.