ठाणे – ठाणे रेल्वे स्थानक परिसरात बेशिस्त रिक्षा चालक अपुऱ्या सेवा सुविधा यामुळे प्रवासी हैराण झाले असतानाच आता वर्गणीच्या नावाखाली काही मंडळांनी वसुलीच सुरू केली आहे. स्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांना आणि रिक्षा चालकांना रस्त्यात गाठून त्यांच्या कडून वर्गणीच्या नावाने पैशांची मागणी केली जात आहे. या प्रकारामुळे प्रवासी हैराण झाले असून त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. हा प्रकार मागील तीन ते चार दिवसांपासून सुरू आहे. मात्र, या गोष्टीकडे पोलिस कानाडोळा करत असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत. यामुळे नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातुन लाखो प्रवासी प्रवास करत असतात. विविध शहरांमधुन येणारे प्रवासी दररोज ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम येथून ये – जा करतात. यामुळे रेल्वे स्थानक परिसरात कायम गर्दी असते. प्रवाशांच्या सोयीसाठी सॅटीस पुलाखाली रिक्षा थांब्याची सोय करण्यात आली आहे. दररोज सॅटीस रिक्षा थांबा, गावदेवी मंदिर परिसर येथे प्रवाशांची रहदारी असते. परंतु, याच रहदारीचा फायदा घेत याठिकाणी काही मंडळांची मनमानी सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. सण उत्सवांसाठी आता मंडळांकडून वर्गणी काढली जात आहे. त्याचबरोबर स्थानक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ रिक्षा चालकांच्या कायम रांगा लागत असतात.
याठिकाणी या मंडळातील काही कार्यकर्ते रिक्षा चालकांची आणि रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांची रस्त्यावरच अडवणुक करत ‘पावती फाडा’ म्हणत २० रूपये किंवा त्याहून अधिक रूपयांची जबरदस्तीने मागणी केली जात आहे. हा प्रकार मागील तीन ते चार दिवसांपासून सुरू असल्याचे काही रिक्षा चालकांनी सांगितले. असे प्रकार होत असताना याठिकाणी पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी तैनात नसतात. यावेळी देणगी स्वच्छेने दिली पाहिजे, ती जबरदस्तीने वसूल केली जात असेल तर ती खंडणीच ठरते अशी प्रतिक्रिया एका रिक्षा चालकाने दिली. सामाजिक सणांचे औचित्य साधून अशा प्रकारे जबरदस्ती वर्गणी गोळा केली जाणे म्हणजे सामान्य जनतेच्या खिशावर गदा आणण्यासारखे आहे. प्रशासनाने या प्रकारांकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि रिक्षा चालकांकडून होत आहे.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना असा प्रकार सुरू असल्यास कारवाईच्या सुचना करू असे परिमंडळ १ चे उपायुक्त सुभाष बुरसे यांनी सांगितले.