ठाणे : माही खान नावाच्या व्यक्तीने एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. यामध्ये माही खान याने दावा केला होता की, त्याला मराठी बोलण्यास भाग पाडले जात होते. मनसे नेते अविनाश जाधव यांनी माही खान याला कोंबडा बनवणार असल्याचा इशारा दिल्यानंतर अवघ्या काही तासातच माही खान याने या प्रकरणावरून माफीनामा मागण्यास सुरुवात केली आहे. त्याने एक व्हिडिओ प्रसारित करून मराठी माणसांची माफी मागत जय महाराष्ट्र म्हटले.
नुकताच एक प्रकार समोर आला आहे. माही खान नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या समाजमाध्यावर एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यामध्ये त्याने दावा केला की त्याला एका महिलेने मराठी बोलण्यास भाग पाडले जात आहे. हे प्रकरण विमानात झाल्याचे दिसते आहे. या घटनेनंतर माही खान याने व्हिडीओ तयार करुन समाजमाध्यमावर मोठ्याप्रमाणात प्रसारित केले.
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी संबंधित महिलेला ठाण्यातील मनसेच्या कार्यालयात बोलावून प्रकरण जाणून घेतले. त्यानंतर अविनाश जाधव यांनी माही खान याला शोधून मराठी बोलण्यास भाग पाडण्याचा इशारा दिला.
महिलेचे नेमके काय म्हणणे आहे
आमचे सकाळचे विमान होते. माही खान हा विमानामध्ये चित्रीकरण करत होता. त्यावेळी माही याने अचानक त्याचे आसन मागे केले. मी त्याला ‘हळू-हळू भाऊ’ असे म्हणाली असता त्याने मराठीत का बोलले असे म्हणत वाद घातला. त्याने कॅमेरा कधी सुरु केला हे देखील माहित नव्हते. मी बंगाली भाषिक आहे. पण मी मराठी चांगले बोलते. त्याने हिमंत असेल तर समोर येऊन बोलावे असे त्या म्हणाल्या. या प्रकरणानंतर महिलेने दावा केला आहे की त्यांची बदनामी झाली असून त्यांना नोकरी देखील गमवावी लागली आहे.
जाधव यांनी या प्रकरणानंतर संताप व्यक्त केला. महिला तीन दिवसांपासून खूप डिस्टर्ब आहेत. त्या भिकारड्याला त्याचे व्हूव वाढत आहेत म्हणून तो व्हिडीओ बनवत आहे. याला आम्ही सोडणार नाही. यांच्या आजोबा, बापाला आम्ही पोसले आहे. त्यानंतरही मराठी बोलले जाणार नाही असे म्हणत असेल तर कान पकडून मराठी बोलायला त्याला लावेल. त्याच्या चॅनलला मराठी प्रेमींनी रिपोर्ट करावे असेही जाधव म्हणाले. या भिकारड्याने पैसे कमविण्यासाठी महिलेचा जाॅब घालवला. याला शोधून कोंबडा बसविला नाही तर माझे अविनाश जाधव नाव नाही असा इसारा जाधव यांनी दिला होता.
मनसेचा दणका
माही खान याला मनसेने इशारा दिल्यानंतर त्याने एक व्हिडिओ प्रसारित करून माफी मागितली आहे. संबंधित व्हिडिओ मी डाऊन केला असून मला कोणालाही दुखवायचे नव्हते. मराठी जनतेला वाईट वाटेल असे मला करायचे नव्हते. माझ्या व्हिडिओमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. मी जिथे राहतो तेथील संस्कृतीचा आदर करण्यावर विश्वास ठेवतो. मी मुंबईत येत असतो, जय महाराष्ट्र! असे तो म्हणाला.
