कल्याण – शिळफाटा रस्त्यावरील रखडलेल्या पलावा पुलावरून मागील सात वर्षापासून शासन आणि शिंदे पिता पुत्रांवर टीकेचे शाब्दिक बाण सोडणाऱ्या मनसेचे नेते राजू पाटील यांनी राज्यातील अभ्यासक्रमातील हिंदी भाषेच्या सक्तीच्या विषयावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या विषयावर भाष्य करतात, मग बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खोटे वारसदार अजून गप्प का आहेत, असा प्रश्न राजू पाटील यांनी ‘एक्स’वर उपस्थित केला आहे.

अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती या विषयांवरून राज्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयांवर भाष्य केले आहे. अजित पवार यांनी इयत्ता पहिली ते चौथी हिंदी विषय नकोच, अशी भूमिका घेतली आहे. या सगळ्या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोठेच दिसत नसल्याने नेहमीप्रमाणे शिंदे पिता-पुत्रांना लक्ष्य करणाऱ्या मनसेच्या राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘कस काय पाटील बर हाय का? या शीर्षकाने डिवचले आहे.

आपणास या विषयावर भाष्य करता येत नसेल तर मग महाराष्ट्रव्यापी नेतृत्वावर टीका का करता, असा प्रश्न करत राजू पाटील यांनी आपली ओळख ही फक्त रखडलेल्या पलावा पुला एवढीच आहे. लोकांनी आपणास घरी बसवले आहे. आणि बाळासाहेबांच्या विचारपुढे तुम्ही फक्त पालापाचोळा आहात, अशी टीपणी केली आहे. समजत नसेल तेथे गुपचिळी आणि जमतय तेथे विकासात पाचर, असा लिखाणाचा रोख ठेवत राजू पाटील यांनी हिंदी सक्ती आणि रखडलेल्या पलावा पुलाचा संबंध जोडत एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

अनुयायी भिडले

राजू पाटील यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेवरून मनसे आणि शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते समाज माध्यमांवर एकमेकांशी भिडले आहेत. पलावा पूल हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पण जनतेच्या प्रश्नांची शिंदे पिता पुत्रांना कोठे जाण आहे. तसे असते तर पलावा पूल कधीच मार्गी लागला असता. राजू पाटील हे जनमानसातील नेते आहेत. राजू पाटील यांच्या जिवावर शिंदे शिवसेनेचा कल्याण लोकसभेचा उमेदवार निवडून आला, याची जाणीव ठेवा असे मनसे समर्थकांनी समाज माध्यमांत म्हटले आहे.

बाळासाहेबांचे वारसदार म्हणता मग हिंदी भाषेच्या शालेय अभ्यासातील सक्तीवर विरोधाची भूमिका का घेत नाहीत, असे प्रश्न मनसे समर्थकांनी केले आहेत. आपले प्रश्न आपणासच सोडावयाचे आहेत त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, भूमिपुत्रांनी एक होऊन बाहेरच्यांना येथून घालवले पाहिजे, अस मनसे समर्थक अनुयायांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदे पिता पुत्रांवर टीका करून काही जण मोठे होण्याचा प्रयत्न करत आहेत. पाच वर्ष झोपून काढली. आता जागे झाल्यावर पोपटपंची सुरू झाली आहे. कामे करून माणूस मोठा होतो, अशी टीका शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मनसेवर केली आहे.