ठाणे : घोडबंदर येथील गायमुख घाटातील रस्ता दुरुस्ती कामानंतर नुकताच खुला करण्यात आलेला असतानाच, त्यापाठोपाठ आता याच मार्गाला जोडण्यात आलेल्या माजिवडा पुलावरील मुंबई मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी ही मार्गिका ३ ते २२ मे या कालावधीत रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आली आहे. शहरात रात्रीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवजड वाहतूकीमुळे कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातून विविध प्राधिकरणांचे रस्ते जातात. या रस्त्यांवर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. हे रस्ते केवळ ठाणे महापालिका क्षेत्रातून जात असल्यामुळे त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर टिका होते. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने विविध प्राधिकरणांना पत्र पाठवून खड्डे भरणीची कामे पावसाळ्यापुर्वी करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानंतर आता विविध प्राधिकरणांनी खड्डे भरणीची कामे हाती घेण्यास सुरूवात केली आहे. गायमुख घाटापाठोपाठ आता माजिवडा पुलावरील घोडबंदरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी मे.एन.ए. कन्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीस परवानगी मिळाली आहे. मास्टिक पद्धतीने ही दुरुस्ती करण्यात येणार असून त्यासाठी उड्डाणपूलाचे पृष्ठभागावरील उंच -सखल झालेले मास्टिक हे मिलिंग यंत्राद्वारे टप्या टप्प्याने खरडून काढण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावर मास्टिक टाकून रस्ता तयार करण्यात येणार आहे. या कामांसाठी ३ ते २२ मे या कालावधीत रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेत या मार्गिकेवरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेऊन या मार्गिकेवरील वाहतूक पर्यायी मार्गिकेवरून वळविली आहे. यासंबंधीची अधिसुचना ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी काढली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे आहेत वाहतूक बदल

घोडबंदर मुंबई वाहिनीवरून मुंबई अथवा नाशिकला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनाना तत्वज्ञान उड्डाणपुलावरून ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. या मार्गावरून जाणारी सर्व प्रकारची वाहने पुलाच्या बाजूला असलेल्या रस्त्याने कापुरबावडी सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील. भिवंडी-मुंबई वाहिनीवरून मुंबई अथवा नाशिकला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बाळकुम अग्निशमन दल समोरील उड्डाण पुलावरून ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. या मार्गावरील सर्व प्रकारची वाहने पुलाच्या बाजूला असलेल्या रस्त्याने कापुरबावडी सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.