ठाणे : मुंबई किंवा कोणत्याही शहरात पाणी तुंबल्यावर मी राजकारण करत नाही. पण, मुंबई तुंबल्यावर सगळेच म्हणायचे की, उद्धव ठाकरे कुठे आहेत. आता तीन वर्षांपासून मुंबई शहर हे राज्य सरकारच्या हातात आहे. त्यामुळे सरकारने त्यावर उत्तर द्यावे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.

रविवारी मध्यरात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागात गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे काही भागात पाणी साचले आहे. मध्य रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच मुद्द्यावरून राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीवर टिका होऊ लागली असतानाच, याबाबत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सोमवारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुंबई किंवा कोणत्याही शहरात पाणी तुंबल्यावर मी कधीच राजकारण केले नाही. परंतु मुंबई शहरात पाणी तुंबल्यावर उद्धव ठाकरेंवर टिका केली जात होती. मुंबईत पाणी तुंबले, कुठे आहेत उद्धव ठाकरे अशी विचारणा केली जायची, असे आव्हाड म्हणाले.

मुंबईत पाणी तुंबल्यावर उद्धव ठाकरे यांना जशी विचारणा केली जात होती, तशीच विचारणा आता राज्य सरकारलाही करायला हवी. कारण, गेल्या तीन वर्षांपासून मुंबई शहर हे राज्य सरकारच्या हातात आहे. त्यामुळे मुंबई तुंबली का, याचे उत्तर राज्य सरकारने द्यावे, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी व्यक्त केली.

ठाणे महापालिका क्षेत्रात रविवार रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. इतर शहरांच्या तुलनेत शहरात पावसाचा जोर कमी आहे. असे असले तरी ढग दाटून आल्याने सर्वत्र काळोख झाल्याने मोठा पाऊस होण्याची चिन्हे होती. या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन अधिकाऱ्यांशी दुरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार असलेले ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचदरम्यान, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. यावेळी आव्हाड आणि म्हस्के या दोघांमध्ये विविध मुद्द्यावर चर्चा सुरु असतानाच, मुंबई पावसात बुडाली, आता ओरडा उद्धव ठाकरे यांच्या नावाने, असा टोला आव्हाड यांनी म्हस्के यांना लगावला. त्यावर आम्ही नव्हे तुम्हीच त्यांच्या नावाने इतके वर्षे ओरडत होता, असे प्रतिउत्तर म्हस्के यांनी दिले. तर मी कधीच पाणी तुंबल्याच्या मुद्द्यावर टीका करत नाही, असे सांगत मुंबईची रचना अशी आहे की, भरतीच्या वेळेत जोरदार पाऊस झाला तर, पाणी साचणारच. पाणी जायला मार्ग कुठे आहे, असे प्रतिउत्तर आव्हाड यांनी दिले.