ठाणे : ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्ष प्रवेशानंतर शरद पवार गटाने बॅनर लावून सुहास देसाईवर टीका केली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ठाण्यात पक्ष प्रवेशाची मालिका सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे विक्रम खामकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे. या पक्ष प्रवेशानंतर शरद पवार गटाने बॅनर लावून सुहास देसाईवर टीका केली आहे.

शरद पवार गटाचे बॅनर

एका ढ विद्यार्थ्याने शाळा सोडली तर नुकसान त्याचे होते. विद्यापीठाचे नाही”, असा संदेश देणारे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने चंदनवाडी परिसरात लावले आहेत. या बॅनरमधून पक्ष सोडणाऱ्यांना फटकारले आहे. या बॅनरची चांगलीच चर्चा परिसरात सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी सुहास देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष सोडला आहे. त्यांचे नाव न घेता, असंघटित सेलचे अध्यक्ष राजू चापले यांनी बॅनरद्वारे त्यांना फटकारले आहे.

पक्ष सोडणाऱ्यांवर टीका

चंदनवाडी , गणेशवाडी परिसरात हे बॅनर लावले असून बॅनरवर, ” पोरं शाळा सोडून गेली तर शाळा बंद पडत नाही. पुन्हा नव्याने विद्यार्थी घडविण्याचे काम शाळा मास्तर करतो. आमचा मात्र लय खमक्या आहे” आणि “डाॅ.जितेंद्र आव्हाड साहेब हे विद्यापीठ आहे; ते कार्यकर्ते घडवतात! एका ढ विद्यार्थ्याने शाळा सोडल्याने नुकसान त्याचे होते, विद्यापीठाचे नाही ! “, असे संदेश लिहून राजू चापले यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर टीका केली आहे.