ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव पूलावर शनिवारी पहाटे तुळई बसविण्याचे काम केले जाणार आहे. ठाणे वाहतुक पोलीस या कामासाठी खारेगाव पूलावर पहाटे दोन ते चार या दोन तासांच्या कालावधीत एकेरी पद्धती वाहतुक सोडणार आहेत. त्यामुळे पहाटे वाहनांचा भार वाढल्यास कोंडी होण्याची शक्यता आहे.
मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव उड्डाणपूलावरून हजारो अवजड, हलकी वाहने वाहतुक करत असतात. या मार्गावरील वाहनांना वाहतुकीसाठी रस्ता अंत्यत अरुंद आहे. त्यामुळे या मार्गावर राज्य रस्ते विकास प्राधिकरणाकडून (एमएसआरडीसी) रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू आहे. येथील वडपे ते माजिवडा रुंदीकरणाचे काम एमएसआरडीसीकडून केले जात आहे. या रुंदीकरणाच्या कामाचा भाग म्हणून शनिवारी पहाटे या मार्गिकेवर तुळई बसविण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी मार्गिकेवर पहाटे वाहतुक पोलिसांनी बदल लागू केले आहेत.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ६ या कालावधीत प्रवेश मिळत असतो. उर्वरित वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी असते. त्यामुळे महामार्गावरून मध्यरात्री, पहाटे मोठ्याप्रमाणात अवजड वाहनांची वाहतुक होत असते. वाहनांचा भार वाढल्यास कोंडी वाढण्याची शक्यता आहे.
असे आहेत वाहतुक बदल
मुंबई नाशिक मार्गावरील सर्व वाहनांना खारेगाव पूलाच्या सुरुवातीस प्रवेशबंदी असेल. येथील वाहने उजव्याबाजूस वळण घेऊन नाशिक मुंबई वाहिनीवरून एकेरी पद्धतीने वाहतुक करतील. खारेगाव पूल संपल्यानंतर बाँबे ढाबा समोरील दुभाजकातील वळण मार्गावर डावे वळण घेऊन पुन्हा मुख्य मार्गाने वाहतुक करू शकतील.