बदलापूरः औद्योगिक क्रांतीनंतर कारखान्यांमुळे होणारे कार्बन उत्सर्जन आणि वृक्षतोड यामुळे वातावरणात बदल दिसून आले. मे सारख्या महिन्यात एका दिवसात २०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडू लागला आहे.भविष्यात अशीच स्थिती राहिल्यास मानवाला जगणे मुष्किल होईल. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी बांबू लागवड आवश्यक आहे. बहुउपयोगी बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे असे आवाहन कृषी मुल्य आयोगाचे पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना केले. ते अंबरनाथ तालुक्यातील वांगणी येथे बांबू लागवड शेतकरी मेळाव्यानिमित्त बोलत होते.

अंबरनाथ तालुक्यातील वांगणी येथे संत ज्ञानेश्वर सभागृहात बांबू लागवडीबाबत शेतकी मेळावा आयोजित करण्यात आला होता. अंबरनाथ तहसिलदार, गट विकास अधिकारी आणि श्रमजीवी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये बांबू लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषी मुल्य आयोगाचे पाशा पटेल उपस्थित होते. तहसिलदार अमित पुरी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरूवात केली. तर पटेल यांनी बांबू लागवडीबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. निसर्गामध्ये होणारे बदल कश्यामुळे होतात हे पटेल यांनी उपस्थितांना समाजावून सांगितले. १७६५ मध्ये इंजिनचा शोध लागला.

पुढे झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे आणि कारखान्यांमुळे होणारे कार्बनचे उर्त्सजन तसेच होणारी वृक्षतोड यामुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला. यंदाच्या वर्षात मे महिन्यामध्ये २०० मिलमीटर पेक्षा जास्त पाऊस मुंबईमध्ये पडला. हा १०० वर्षांचा इतिहास आहे. तर २०२४ मध्ये वातावरणातील कार्बनडायऑक्साईडचे प्रमाणे ४२७ पीपीएम इतके होते. ते २०५० पर्यंत ४५० पीपीएमपर्यंत पोहोचू शकते, असे पटेल यावेळी बोलताना म्हणाले. जर असे झाले तर मानवाला पृथ्वीवर जगणे मुश्कील होईल. त्यामुळे येणाऱ्या पीढीसाठी निसर्ग वाचवणे काळाची गरज आहे, असे पटेल म्हणाले.

अशा स्थितीत बांबू लागवड महत्वाची आहे. बांबू हा वातवरणातील कार्बनडायऑक्साईड शोषून घेतो आणि ऑक्सीजन वातावरणात सोडतो. बांबूपासून इथेनॉल तयार करता येते. भारतामध्ये आसाम या राज्यात इथेनॉल निर्मिती करण्याचा कारखाना भारत सरकारतर्फे सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे बांबू हे बहुउपयोगी आहे. बांबूपासून चष्मा, टॉवेल, टिशर्ट, पेन, घडयाळ आणि इतर लोकोपयोगी वस्तू तयार केल्या जाऊ शकतात. यावेळी बांबू पासून तयार केलेल्या वस्तू मेळाव्यामध्ये मांडण्यात आल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यशासनामार्फत महात्मा गांधी रोजगार हमी योजनाअंतर्गत बांबू लागवडीसाठी ७ लाख ०४ हजार ६४५ इतके अनुदान उपलब्ध असल्याची माहिती गट विकास अधिकारी पंडित राठोड यांनी दिली. यावेळी अंबरनाथचे तहसिलार अमित पुरी यांच्यासह गटविकास अधिकारी, इतर विभागाचे अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.