ठाणे : कसारा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चारवर प्रवेश करणाऱ्या रेल्वेगाडीवर दरड कोसळून प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. जखमी प्रवाशावर प्राथमिक उपचार करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. या घटनेनंतर कसारा भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये काहीसे भितीचे वातावरण पसरले होते. तर प्रवासी संघटनांकडूनही येथील प्रवाशांच्या समस्या प्रशासनाने जाणून घ्याव्यात अशी मागणी केली जात आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील कसारा रेल्वे स्थानक महत्त्वाचे स्थानक आहे. या मार्गिकेवरून नाशिकच्या दिशेने लांब पल्ल्याच्या गाड्या वाहतुक करत असतात. नाशिक भागातून मुंबई, ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी देखील हे रेल्वे स्थानक महत्त्वाचे आहे. तसेच या भागातील पाडे, गावातून नोकरदार मुंबईत कामानिमित्ताने येतात. कसारा भागातून दिवासाला हजारो नोकरदार मुंबई, ठाण्याच्या दिशेने वाहतुक करतात. कसारा भागातील प्रवाशांना उपनगरीय रेल्वेगाड्या पुरेशा प्रमाणात नाहीत. त्यामुळे या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची नेहमी गर्दी असते.

रात्री आणि सकाळी कामाच्या वेळांमध्ये या गाड्यांमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी असते. कसारा रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण मागील काही वर्षांपासून वाढले आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास मुंबईहून कसारा रेल्वे स्थानकाच्या दिशेने उपनगरीय रेल्वेगाडी जात होती. ही रेल्वेगाडी कसारा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चारवर प्रवेश करत होती. त्यावेळी रेल्वेगाडीच्या मागून तिसऱ्या डब्यावर एक दरड अचानक कोसळली.

या घटनेत रेल्वेगाडीच्या दारात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या पायावर ती दरड कोसळली. त्यामुळे त्याच्या पायाला मार लागून त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती रेल्वे कर्मचारीआणि रेल्वेगाडीतील इतर प्रवाशांना मिळाली, ते सर्वजण त्या जखमी प्रवाशाच्या मदतीसाठी धावून आले. फलाटावर रेल्वेगाडी थांबल्यानंतर प्रवाशाला प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर त्या प्रवाशाच्या पायाला टाके पडल्याची माहिती काही प्रवाशांनी दिली. ही घटना घडल्यानंतर इतर प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेनंतर प्रवाशी संघटनांकडून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रवाशांच्या समस्या प्रशासन केव्हा जाणून घेईल असा प्रश्न संघटनांकडून विचारला जात आहे. कसारा रेल्वे स्थानकातून मागील काही वर्षांमध्ये प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे या भागात रेल्वे प्रवाशांच्या समस्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.