ठाणे- जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागात “प्लास्टिक मुक्त ग्राम” अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हे अभियान २२ मे पासून सुरु झाले असून ५ जून पर्यंत राबवले जाणार आहे. या अभियानाबाबत ग्रामीण भागात विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

प्लास्टिकच्या अति वापरामुळे प्रदूषण होत असून निसर्गाला हानी पोहोचते. यासाठी प्लास्टिक बंदी हा एकमेव पर्याय आहे, शहरी भागात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, अनेकजण छुप्या पद्धतीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना दिसून येतात. त्यांच्यावर कारवाई देखील केली जाते. आता, ग्रामीण भागात देखील प्लास्टिकचा वापर कमी व्हावा यासाठी महत्त्वपू्र्ण पाऊले शासनाने उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या पर्यावरण आणि स्वच्छतेविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत “प्लास्टिक मुक्त ग्राम” अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत हे अभियान राबविण्यास २२ मे पासून सुरुवात झाली आहे. ५ जून पर्यंत हे अभियान राबविले जाणार असून या कालावधीत विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रमात ग्रामसभा, महिला बचत गट, युवक मंडळे, स्थानिक शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे आणि स्थानिक स्वच्छता समित्यांचा उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग असणार आहे.

– या मोहिमेत पार पडणारे उपक्रम

२८ मे २०२५ : मासिक पाळी व्यवस्थापन दिन – शाळांमधून किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन

२९ मे २०२५ : थीम – एक पृथ्वी, एक आरोग्य’ दिन – योग व आरोग्यविषयक उपक्रम

५ जून २०२५ : जागतिक पर्यावरण दिन – समारोप व विशेष उपक्रम

या मोहिमेअंतर्गत प्लास्टिक वापर कमी करण्याबरोबरच महिलांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. ‘थीम एक पृथ्वी, एक आरोग्य’ या संकल्पनेतून आरोग्य आणि पर्यावरण यांचे नाते दृढ केले जाईल.- प्रमोद काळे, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्लास्टिक मुक्त ग्राम ही केवळ घोषणा नाही. तर, प्लास्टिक मुक्त ग्राम हे कृतीत उतरवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामस्थाचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा आहे. – छायादेवी शिसोदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे.