ठाणे : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. भिवंडी आणि ठाणे शहरात बकरी ईदच्या दिवशी ५०० हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. समाजमाध्यमांवरही पोलिसांचे लक्ष आहे. शहरातील शांतता समिती, गो-रक्षक यांच्या बैठका देखील घेण्यात आल्या. भिवंडी आणि ठाणे महापालिकेकडूनही भिवंडी आणि मुंब्रा, शिळ डायघर भागात विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील भिवंडी, मुंब्रा आणि ठाण्यातील राबोडी हे मुस्लिम बहुल परिसर आहेत. याठिकाणी बकरी ईदच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आतापासून खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. भिवंडी शहरातील नारपोली, भिवंडी शहर, भोईवाडा, निजामपूरा, शांतीनगर, कोनगाव तसेच ठाण्यातील मुंब्रा, शिळ-डायघर आणि राबोडी पोलीस ठाण्यात पोलिसांनी शांतता समितीच्या बैठक घेतल्या. नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय, या सर्वच भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच गो-रक्षकांच्या देखील बैठका पोलिसांनी घेतल्या. वाहतुक पोलिसांकडूनही बकरी ईदच्या दिवशी ठिकठिकाणी वाहतुक बदल लागू केले जाणार आहेत.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून या भागात ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. तसेच ७० अधिकारी आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्याही तैनात असतील.
भिवंडीत ५६ ठिकाणी कुर्बानी
भिवंडीत ५६ ठिकाणी कुर्बानी तयार करण्याचे नियोजन आहे. तसेच, या केंद्रांवर २०० टेम्पो, १४ जेसीबी, ११ जीप, तीन क्रेन इतक्या वाहनांची व्यवस्था महापालिकेने केले आहे. तसेच कुर्बानीनंतर तेथील भागाची स्वच्छता करण्याकरिता २५ पाण्याचे टँकर उपलब्ध असणार आहे. कुर्बानीपुर्वी जनावरांची तपासणी करण्याकरिता पशुवैद्यकीय विभागाकडून ९६ पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करुन देण्यात आले आहे असे भिवंडी महापालिकेने स्पष्ट केले.
भिवंडी आणि मुंब्रा भागात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती, गो-रक्षकांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह इतर बंदोबस्ताचेही नियोजन आहे. – विनायक देशमुख, अपर पोलीस आयुक्त, (पश्चिम विभाग) ठाणे पोलीस.