ठाणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासंदर्भातील प्रश्न केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे. राज्य शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत तातडीने दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करुन विमानतळाला नाव जाहिर करावे. तशी सूचना जारी करावी. अन्यथा असंतोषाचा स्फोट होईल असा इशारा कृती समितीच्या वतीने अध्यक्ष दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी अनेक मोर्चे निघाले होते. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देणे तसेच इतर प्रश्नांबाबत विचारविनिमय करण्यासाठी ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दशरथ पाटील बोलत होते.
बैठकीला माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, जे. डी. तांडेल, संतोष केणे, गुलाब वझे, नितीन पाटील, डॉ. यशवंत सोरे, शरद म्हात्रे, वासुदेव भोईर, दीपक पाटील, दीपक म्हात्रे, सीमा घरत, संजय घरत, संतोष घरत, धीरज कालेकर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोकनेते दि. बा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे यासाठी आजवर अनेक आंदोलने केली. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या नावाचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठविला आहे. परंतु हा ठराव केंद्रात अजूनही प्रलंबित आहे. विमानतळाचे काम आता पूर्णत्वास आले आहे. कदाचित नोव्हेंबर पासून उड्डाणाला सुरुवात होईल. अशावेळी दि. बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला देणे गरजेचे आहे, असे दशरथ पाटील म्हणाले.
केंद्र सरकारच्या हवाई वाहतूक मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन कृती समितीच्या वतीने या प्रश्नाचा पाठपुरावा केला आहे. तरीही आजपर्यंत हा प्रश्न केंद्रात प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे. या असंतोषाचा स्फोट होऊ न देता केंदाने हा प्रश्न त्वरीत सोडवावा असे दशरथ पाटील म्हणाले. विमानतळ परिसरात नोकऱ्यांचा प्रश्न कसा सोडवायचा त्यात प्रकल्पग्रस्तांना व ठाणे, रायगड, पालघर, मुंबई येथील भुमिपूत्रांना प्राधान्य देऊन नोकरभरती करण्यासाठी प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे दशरथ पाटील म्हणाले. दि. बा. पाटील यांचा स्मृतीदिन २४ जूनला आहे. या दिवशी काही भव्य कार्यक्रम आखता येईल का? यावर बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. यासाठी वेगवेगळ्या भागात त्या त्या भागातील कार्यकर्त्यांनी लोकजागृती करत बैठका घ्याव्यात आणि कार्यक्रम यशस्वी करावा असे सांगण्यात आले.