ठाणे : येथील कापुरबावडी ते माजिवाडा परिसरात असलेल्या उड्डाण पुलावरील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. परंतु या वाहिन्या अनेक ठिकाणी तुटलेल्या असून त्यातून पावसाचे पाणी धबधब्याप्रमाणे थेट रस्त्यावर पडत आहे. यामुळे वाहनांचे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. ठाणे येथील कापुरबावडी भागात उड्डाण पुल आहे. या पुलावरील मार्गिका घोडबंदर, भिवंडी आणि ठाणे शहराच्या दिशेने जातात. या पुलावरून सतत वाहनांची वाहतूक सुरू असते.
हेही वाचा >>> ठाणेकरांनो, शक्य असल्यास मुंबई नाशिक महामार्गावरून वाहतूक टाळा ; ठाणे पोलिसांचे आवाहन
या पुलाखाली मोठा रस्ता आहे. या रस्त्यावरून घोडबंदर, बाळकुम, भिवंडी, कॅसलमील आणि ठाणे शहराच्या दिशेने वाहनांची वाहतूक सुरू असते. या वाहनांची संख्या मोठी आहे. याठिकाणी होणारी कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यावर दुभाजक बसवून चक्राकार पद्धतीने वाहतूक करण्यात आली आहे. या रस्त्यावरच असलेल्या उड्डाण पुलावरील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पुलाच्या खालील बाजूस वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. परंतु या वाहिन्या जागोजागी फुटलेल्या आहेत. त्यामुळे पुलावरील पावसाच्या पाणी वाहिन्यांमधून वाहून जाण्याऐवजी ते थेट रस्त्यावर पडत आहे.
हेही वाचा >>> कल्याणमधील मारुती मंदिरात चोरी करणारा चोरटा भिवंडीतून अटक
धबधब्याप्रमाणे पाणी पडत असून तेथून जाणाऱ्या वाहनचालकांना या पाण्यामुळे पुढचे काहीच दिसत नाही. त्यामुळे वाहन धडकून अपघात होण्याची शक्यता आहे. चार ते पाच ठिकाणी वाहिन्या तुटून धबधबे तयार झाले आहेत. गेल्या पावसाळ्यातही हेच चित्र होते. पावसाळ्यानंतर वाहिन्यांची दुरुस्ती केली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आलीच नाही. परिणामी, यंदाच्या पावसाळ्यातही पुलावरील पाणी रस्त्यावर धबधब्याप्रमाणे पडताना दिसत आहे. या वाहिन्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.