महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या १७ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ठाण्यात आयोजित कार्यक्रमात गुरुवारी (९ मार्च) जोरदार टोलेबाजी केली. राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच प्रचंड उत्साहाने त्यांच्या नावाच्या घोषणा देणाऱ्या मनसैनिकांवरच मिश्किल टिपण्णी केली. तसेच एक विनोद सांगत त्यांना टोला लगावला.

राज ठाकरे म्हणाले, “मी महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिकडेही अशाच घोषणा झाल्या. त्यावेळी मला एक विनोद आठवला. एकेदिवशी शिवचरित्रकार दत्तोवामन पोतदार रायगडावर गेले. जाताना त्यांनी आकाशात पाहिलं आणि समोर एक शेतकरी होता त्याला विचारलं की, आज पाऊस पडेल का?”

“आतून आवाज आला इतक्या लोकांना जागा नाही”

“शेतकऱ्याने बघितलं आणि म्हणाला पाऊस पडेल असं वाटत नाही. थोडावेळाने ढग आले, आकाश भरलं आणि जोराचा वारा-पाऊस सुरू झाला. काय करायचं म्हणून पोतदार एक झोपडं दिसलं तिकडे गेले. टकटक केलं, आतून आवाज आला की, कोण आहे? यांनी सांगितली की, शिवचरित्रकार महापोध्याय दत्तोवामन पोतदार. आतून आवाज आला इतक्या लोकांना जागा नाही,” असं राज ठाकरेंनी सांगितलं. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

हेही वाचा : MNS Anniversary: “मनसेच्या वाट्याला कुणी जायचं नाही, गेलं ना मुख्यमंत्रीपद”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…तर मला कुणी घरात येईल का?”

राज ठाकरे इथेच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, “असं जर माझ्याबाबतीत झालं, मी झोपडीवर टकटक करतो आहे आणि या घोषणा देणाऱ्यांपैकी कोणीतरी माझं नाव सांगितलं, तर मला कुणी घरात येईल का?” राज ठाकरेंनी मनसैनिकांनाच लगावलेला हा मिश्किल टोला ऐकून उपस्थितांमध्ये पुन्हा एकदा हशा पिकला. शर्मिला ठाकरे यांनाही हसू अनावर झालं.