डोंबिवली – कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना झटपट रिक्षा वाहतुकीची सेवा देऊन व्यवसाय करण्याऐवजी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात प्रवाशांची अडवणूक करणाऱ्या काही मोजक्या रिक्षा चालकांना कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी तंबी दिली. प्रवाशांना नाहक अडवून का ठेवता. तुम्हाला हा अधिकारी कोणी दिला, असे प्रश्न करत आमदार मोरे यांनी अशाप्रकारे अडवणूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न केले जातील, असा इशारा दिला.
रिक्षातील प्रवासासाठी मोटार वाहन कायद्याने तीन प्रवाशांना मुभा आहे. चौथा प्रवासी वाहतुकीसाठी कायद्याने परवानगी नाही. तरीही अनेक रिक्षा चालक आपल्या जवळील अर्ध आसनावर चौथा प्रवासी घेऊन प्रवासी वाहतूक करतात. या नियमबाह्य प्रवासी वाहतुकी विरुध्द जिल्ह्यात वाहतूक विभागाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. डोंबिवलीत अशी कारवाई सुरू असताना काही मोजक्या रिक्षा चालकांनी पूर्व भागातील इंदिरा चौकात शनिवारी संध्याकाळी अचानक एकावेळी रिक्षा आणून वाहतुकीला अडथळा आणला. एक तास रिक्षा चालकांनी बस, इतर प्रवासी वाहतूक रोखून धरली. अनेक प्रवाशांनी याप्रकरणी शिवसेना मध्यवर्ति शाखेत जाऊन आमदार राजेश मोरे यांच्याकडे तक्रारी केल्या. आमदार मोरे, शहर सचिव संतोष चव्हाण आणि इतर पदाधिकारी तातडीने इंदिरा चौकात आले. यावेळी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील तेथे उपस्थित होते.
चौथ्या आसनावरील कारवाईच्या विरोधात रिक्षा चालकांनी रस्ता बंद आंदोलन केल्याची माहिती समजताच आमदार राजेश मोरे यांनी रिक्षा चालकांना फैलावर घेत हा अधिकार तुम्हाला कोणी दिला. प्रवाशांची का अडवणूक करता, असे प्रश्न करून केडीएमटीच्या बस वाहतुकीला रिक्षांच्या कोंडीतून मुक्त करून पुढे जाऊ देण्याचे आदेश दिले. बसमध्ये वाढीव प्रवासी भरले जातात. मग रिक्षेत एक प्रवासी वाढीव भरला तर काय बिघडले, असे प्रश्न यावेळी काही रिक्षा चालक करत होते.
मोर्चा रद्द
वाहतूक विभागाने रिक्षा चालकांविरुध्द सुरू केलेल्या कारवाईच्या विरुध्द लाल बावटा रिक्षा संघटनेने गुरुवार, २६ जून रोजी वाहतूक शाखेवर मोर्चाचे आयोजन केले होते. परंतु, साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, वाहतूक अधिकारी आणि रिक्षा संघटना पदाधिकारी यांची बैठक होऊन त्यात सामंजस्याने चर्चा झाली. त्यामुळे गुरूवारचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे, असे लाल बावटा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी सांगितले. रिक्षा चालकांनी गणवेश घालून, चौथ्या आसनावर प्रवासी न घेता प्रवासी वाहतूक करावी, असे आवाहन कोमास्कर यांनी केले आहे.