ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुख्य आणि सेवा रस्ते जोडणीची कामे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असली तरी, यासाठी करण्यात येत असलेल्या खोदकामादरम्यान रस्त्याखालून जाणाऱ्या विद्युत वाहीन्या तुटण्याचे प्रकार वाढील लागले आहेत. या वाहिन्या तुटल्यामुळे अनेक भागांचा वीज पुरवठा खंडीत होत असून यामुळे घोडबंदर भागात गेल्या काही दिवसांपासून वीजेचा लंपडाव सुरू आहे. त्याचा फटका महिला, शालेय विद्यार्थ्यांसह घरातून ऑनलाईनद्वारे कार्यालयीन काम करणाऱ्यांना बसत असल्याचे चित्र आहे.

घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. वाढत्या नागरिकरणाबरोबरच वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. ही सर्व वाहने घोडबंदर मार्गे वाहतूक करतात. याशिवाय, उरण येथील जेएनपीटी बंदर ते गुजरात मार्गे होणारी अवजड वाहतूकही घोडबंदर मार्गेच होते. यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होते. त्यातच या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्याने कोंडीत भर पडते. या मार्गालगत दोन्ही बाजुला सेवा रस्ते होते. या रस्त्यांवर बेकायदा वाहने उभी केली जात होती. यामुळे त्याचा वापर वाहतूकीऐवजी बेकायदा पार्किंगसाठीच होत होता, असे चित्र होते. यामुळे दोन्ही बाजूचे सेवा रस्ते मुख्य रस्त्यांचा जोडून रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे. यासाठी सेवा रस्ते खोदून त्याठिकाणी गटार आणि काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात येत आहेत. कापुरबावडी ते गायमुखपर्यंत हे काम सुरू आहे. परंतु या रस्त्यासाठी खोदकाम करताना कोणतीही काळजी घेतली जात नसल्याची ओरड होत असतानाच आता खोदकामादरम्यान विद्युत वाहीन्या तुटत असल्याची बाब पुढे आली आहे. या वाहिन्या तुटल्यामुळे अनेक भागांचा वीज पुरवठा खंडीत होत असून यामुळे घोडबंदर भागात गेल्या काही दिवसांपासून वीजेचा लंपडाव सुरू आहे. यापुर्वी विद्युत पुरवठा खंडीत झाल्यावर दहा ते पंधरा मिनीटात वीज पुरवठा सुरळीत होत होता. मात्र, आता एक ते दिड तास काही वेळेस त्याहून अधिक काळ वीज पुरवठा खंडीत होतो. त्याचा फटका महिला, शालेय विद्यार्थ्यांसह घरातून ऑनलाईनद्वारे कार्यालयीन काम करणाऱ्यांना बसत असल्याचे चित्र आहे. वाहिन्या तुटण्याचे प्रमाण वाढल्याने महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारीही हैराण झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घोडबंदर येथील पातलीपाडा भागात वीजेचा पुरवठा करण्यासाठी मुख्य स्थानक उभारण्यात आलेले आहे. तसेच विविध भागात सब स्थानक उभारण्यात आलेले आहेत. मुख्य स्थानकातून सब स्थानकात वीज पुरवठा केला जातो आणि त्याचा पुरवठा पुढे विविध भागांना केला जातो. यासाठी घोडबंदर रस्त्याखालून विद्युत वाहीन्या टाकण्यात आलेल्या आहेत. या वाहीन्या रस्ते कामामुळे तुटण्याचे प्रकार वाढले असून यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढल्याची माहीती महावितरणच्या काही अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.