ठाणे – जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत घरकुल योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी घरकुल योजनेसाठी दिलेले उद्दिष्ट आणि योजनेचा लाभ मिळालेले लाभार्थी यात तफावत असल्याचे मंत्री गोरे यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न केला. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यामुळे गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे उडविले.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यात ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यात येतात. ग्रामीण भागात जे कुटुंब कच्चा घरात राहतात, त्यांना पक्के घर मिळावे, त्यांचे जीवनमान उंचवावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ठाणे जिल्ह्याला १८ हजार २४८ घरकुलांचे उद्दिष्टे दिले आहे. त्यापैकी १७ हजार ९७५ लाभार्थी घरकुलांसाठी पात्र झाले असून त्या लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला असल्याची माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी यावेळी बैठकीत दिली. तसेच ८ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देखील देण्यात आला असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी पहिला हप्ता दिलेल्या लाभार्थ्यांपैकी किती घरकुलांची कामे सुरु झाली अथवा सुरूच झाली नाही, याची माहिती विचारली असता, प्रशासनाकडून कोणतेच अपेक्षित उत्तर देण्यात आले नाही. तसेच मनुष्यबळाचे मस्टर तयार करण्यात आले का? असा सवाल देखील उपस्थित केला. परंतू, प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यामुळे मंत्री गोरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.

योजना राबविणे म्हणजे पाट्या टाकणे नाही

शासनाच्या विविध योजना लोकाभिमुख असून त्या योजना व सोयी-सवलती विहित वेळेत नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. एखादी योजना राबविताना केवळ उद्दिष्टपूर्ती करणे किंवा प्रकरण निकाली काढणे हा हेतू नसावा. त्यातून सामान्य जनतेचे कितपत समाधान झाले यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शासनाच्या योजना राबविणे म्हणजे केवळ पाट्या टाकणे नव्हे, अश्या शब्दात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.