कल्याण – टिटवाळा येथील बल्याणी भागातील केबीके इंटरनॅशनल शाळेच्या मागील भागातील संरक्षित भिंत शुक्रवारी दुपारी बाजुच्या एका बैठ्या चाळीच्या मधल्या भागात कोसळली. यावेळी तेथे खेळत असलेली तीन मुले या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. यामधील एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमी मुलांवर कल्याण आणि मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. पालिकेच्या अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून शाळा चालक व व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. ही मुले या शाळेची विद्यार्थी होते, असे रहिवासी सांगतात. या दुर्घटनेत हंसराज महेंद्र सिंग (११) या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. अभिषेक राजेश सहानी (१०), शोएब शेख (१०) हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
संरक्षक भिंत कोसळताच मोठा आवाज झाला. रहिवाशांना मुले ढिगाऱ्याखाली दबली गेल्याचे समजताच परिसरातील रहिवाशांनी ढिगारा उपसून मुलांच्या बचावासाठी धावपळ केली. ढिगारा उपसताना बराच वेळ गेला. त्यामुळे एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. एका मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याने शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी मुलांच्या पालक आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पालिका अग्निशमन दल, टिटवाळा पोलीस आणि अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने अग्निशमन जवानांकडून ढिगारा उपसून बाजुला करण्याचे काम हाती घेण्यात आले.
शाळेची संरक्षित भिंत धोकादायक झाली आहे. ती दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी व्यवस्थापनाकडे केली होती. शाळेने त्याकडे दुर्लक्ष केल्याची रहिवाशांची तक्रार आहे. अखेर त्याच धोकादायक भिंतीखाली एका मुलाचा मृत्यू झाला आहे.