कल्याण डोंबिवलीत पालिका हद्दीत पावसाळ्यापूर्वीची गटार सफाईची कामे करताना कामगारांना जीव सुरक्षेची कोणतेही साधने ठेकेदाराकडून देण्यात येत नाहीत. त्यामुळे जीव धोक्यात घालून कामगारांना गटार सफाई करावी लागत आहे. याविषयी कामगार खासगीत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

ठेकेदाराकडे हातमोजे, मुखपट्टी, शिरस्त्राण मागितले की त्याची गरज काय आहे. हाताने सर्व कामे करायची आहेत. असे बोलून ठेकेदार जीव सुरक्षेची साधने देण्यास नकार देतो. अधिक बोलले की तुम्ही तुमची कामे करा. काही होणार नाही तुम्हाला, असे सांगून कामे करण्याचे आदेश देतो, असे कामगारांनी सांगितले.

हेही वाचा >>> कल्याण: बदली आदेश नसताना उप अभियंत्याचे कडोंमपा नगररचना विभागात चार वर्षापासून बस्तान

पाऊस उंबरठ्यावर आला तरी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील प्रभागांमधील गटार सफाईची कामे सुरू आहेत. ही कामे आता होणार कधी असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. प्रभागांमधील चाळी, झोपडपट्टी, बाजारपेठ असलेल्या भागातील गटारे गाळ, कचऱ्याने भरली आहेत.

अनेक ठिकाणी बेकायदा इमले बांधणाऱ्या माफियांनी गटारांची तोडफोड केली आहे. बांधकामाचे साहित्य अवजड ट्रकमधून नेता अनेक ठिकाणी गटारे तोडून टाकण्यात आली आहेत. या गटारांमधील सांडपाणी अनेक ठिकाणी रस्त्यावरुन वाहते. अशा ठिकाणी गटार सफाई करताना कामगारांची दमछाक होत आहे.

स्थानिक माजी नगरसेवक मागील तीन वर्षापासून पालिकेतून निधी मिळत नसल्याने आपल्या प्रभागातील गटार, नालेसफाईची कामे व्यवस्थित झाली पाहिजेत याकडे लक्ष देत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. माजी नगरसेवकांना गटार, नालेसफाई ठीक होत नसल्याची तक्रार केली की तुम्ही आयुक्तांकडे तक्रार करा, अशी उत्तरे दिली जातात, असे रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा >>> ठाणे: राज्यात महाविकास आघाडीच्या दोनशे जागा येतील; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा भागात प्रफुल्ल गोरे, सिध्देश कीर, गणेशनगर भागात, देवीचापाडा काळुबाई मंदिराजवळील मुकेश म्हात्रे आणि जितू म्हात्रे यांनी उभारलेल्या बेकायदा इमारतींजवळ गटारे बांधकाम साहित्याने, गाळाने भरुन गेले आहे. काही भागात गटारेच नाहीत. पावसाचे पाणी या भागातून वाहून कुठे जाईल, असा प्रश्न स्थानिक रहिवासी करत आहेत. मुकेश म्हात्रे यांनी कबुछाया, देवकी निवास इमारती जवळ उभारलेल्या बेकायदा इमारतीला सामान वाहू उद्वाहन धोकादायक स्थितीत रस्त्यावर आहे. सोसायट्याच्या वाऱ्याने ते कोसळण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत. याठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने कबुछाया बंगल्या समोर पाणी तुंबण्याची भीती स्थानिक रहिवासी व्यक्त करतात. आयरे गाव, नांदिवली भागात अशीच परिस्थिती आहे. ज्या भूमाफिया, रहिवाशांनी गटारांच्या मार्गिका बंद केल्या आहेत. त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच जे ठेकेदार गटार सफाई कामगारांना जीव सुरक्षेची साधने देत नसतील त्यांच्यावर पालिकेने कारवाई करण्याची मागणी डोंबिवली पश्चिमेतील गजानन जोशी, अनमोल म्हात्रे या जागरुक रहिवाशांनी आयुक्तांकडे केली आहे.