कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेने शासकीय अध्यादेशानुसार कचरा शुल्कात वाढत केली आहे. ही वाढ अन्यायकारक असल्याचा आरोप करत सोमवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिवसैनिक, नागरिक अधिक संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.
आतापर्यंत मोर्चा पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर अडविला जात होता. परंतु आक्रमक शिवसैनिकांनी मुख्य प्रवेशव्दारातून थेट पालिका मुख्यालयाच्या आवारात प्रवेश केला. प्रशासनाच्या निषेधार्थ यावेळी घोषणा देण्यात येत होत्या. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा पालिकेत बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकरी मुख्य प्रवेशव्दारातून आक्रमकपणे पालिका आवारात घुसताच पोलीस, पालिका सुरक्षारक्षकांची दाणादाण उडाली. महागाईने भरले भंडार तरी करवाढ, करवाढ म्हणजे जनतेचा छळ, चेन्नई कित्ता आम्हाला नको, अशा घोषणा मोर्चेकरी देत होत्या. महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
मोर्चेकरांनी जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. नागरिक आणि व्यावसायिक कचरा संकलन शुल्कात केलेली वाढ अन्यायकारक आहे. ही वाढ तात्काळ रद्द करा, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला.
यावेळी आयुक्तांना शिष्टमंडळाकडून निवेदन देण्यात आले. कचरा शुल्कातून पालिका महसूल वाढविण्याचा प्रयत्न करत असेल तर पालिकेने केंद्र सरकारकडे निधीची मागणी करावी किंवा यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेला साडे सहा हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले होते. त्या निधीतील एक पैसाही पालिका तिजोरीत आला नाही. त्यामुळे त्या पॅकेजची मागणी प्रशासनाने शासनाकडे करावी, असे जिल्हाध्यक्ष म्हात्रे यांनी आयुक्तांना सुचविले.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत स्वच्छतेचा चेन्नई कित्ता सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून शहरात स्वच्छतेचे उपक्रम राबविले जात आहेत. या कित्त्यासाठी नागरिकांवर करवाढ होता कामा नये, असे शिष्टमंडळाने आयुक्तांना सांगितले.
मोर्चात ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी, गुरूनाथ खोत, अल्पाफ शेख, जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, शहरप्रमुख अभिजीत सावंत, बाळा परब, प्रकश तेलगोटे, जिल्हा संघटक तात्या माने, महिला संघटक वैशाली दरेकर, उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, रूपेश भोईर, काँग्रेस नेते संतोष केणे, एकनाथ म्हात्रे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राजू शिंदे सहभागी झाले होते.