लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून मुंबई, ठाण्यात उन्हाचा पारा वाढत असताना उष्णतेचा फटका नागरिकांसह भटक्या प्राण्यांनाही सहन करावा लागत आहे. १० ते १६ एप्रिल या सहा दिवसांत भटक्या प्राण्यांच्या निर्जलीकरणाची ३१६ प्रकरणे मुंबई, ठाणे जिल्ह्यात समोर आली आहेत. यामध्ये श्वान आणि मांजरींचे प्रमाण अधिक आहे. काही भटके प्राणी उष्णतेपासून बचावासाठी वाहनाखाली बसलेले असतात. या वाहनांच्या चाकाखाली येऊन प्राण्यांचे अपघातही होऊ लागली आहेत. त्यामुळे दुहेरी संकट प्राण्यांवर ओढावत आहे. श्वान आणि मांजरींप्रमाणे गाई, बैल, गाढव यांसारख्या मोठ्या प्राण्यांनाही फटका बसत आहे.

गेल्याकाही दिवसांपासून तापमान वाढत आहे. नागरिकांना या उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. त्यामुळे दुपारी अनेकजण घराबाहेर पडणे टाळत आहेत. माणसांच्या डोक्यावर छप्पर आहे. परंतु भटक्या प्राण्यांना सावली आणि पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे. प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या सिटीजन्स फाॅर ॲनिमल फाऊंडेशन (कॅप) या स्वयंसेवी संस्थेकडे १० ते १६ एप्रिल या कालावधीत प्राण्यांच्या निर्जलीकरणाच्या ३१६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रकरणे श्वान आणि मांजरींची आहेत. ३१६ पैकी ९५ तक्रारी ठाणे जिल्ह्यातील आहेत. यामध्ये ६३ श्वान आणि ४२ मांजरींचा सामावेश आहे. त्याप्रमाणे पाच कबुतर, दोन खारी, चार ते पाच कावळे निर्जलीकरणाचा फटका बसला आहे. या संस्थेचे स्वंयसेवक वाहनाने ठिकठिकाणी फिरत असताना ही प्रकरणे आढळून आली आहेत. त्यामुळे निर्जलीकरणाची प्रकरणे आणखी जास्त असू शकतात. असा अंदाज वर्तविला जात आहे. ठाण्यातील पशू वैद्यकीय रुग्णालयांत उष्माघाताची प्रकरणे देखील वाढत असल्याचे डॉ. सुहास राणे यांनी सांगितले.

आणखी वाचा-उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण

भटक्या प्राणी किंवा पक्ष्यांमध्ये निर्जलीकरणाची लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ त्यांच्या बचावासाठी पुढे येणे आवश्यक आहे. भटक्या प्राण्यांच्या अंगावर ओले कपडे ठेवावे, त्यांना सावलीत न्यावे आणि पाणी द्यावे. पक्षी आढळून आल्यास त्यांना एका वाटीमध्ये पाणी आणि खाद्य ठेवावे. घराच्या खिडक्यांमध्ये पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे. हे पाणी गरम झाल्यास ते बदलावे. नागरिकांनी त्यांच्या गृहसंकुलाच्या आवारातील प्राणी-पक्ष्यांची काळजी घेतल्यास आम्हाला मोठी मदत होईल. – सुशांक तोमर, संस्थापक, कॅप संस्था.

संस्थेचे स्वंयसेवक दररोज सकाळी ८ ते रात्री उशीरापर्यंत निर्जलीकरणामुळे त्रस्त प्राण्यांचा शोध घेत असतात. या दरम्यान, काही स्वयंसेवींनाही उन्हाचा फटका सहन करावा लागत आहे. आठवड्याभरात संस्थेचे दोन स्वयंसेवी आणि एका कर्मचाऱ्याला निर्जलीकरणाचा त्रास झाला. त्यामुळे स्वयंसेवीच्या प्रकृतीवरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे.