ठाणे : राज्यातील मुंबई, पुणे, नवी मुंबई तसेच ठाणे यांसारखी आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या शहरांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी वेगाने होते आहे आणि ही शहरे विकासाकडे वाटचाल करत आहेत. मात्र या शहरांबरोबरच राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या शहरांना देखील विकासाच्या प्रवाहात आणणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही एक टीम म्हणून काम करत आहोत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केले.ठाणे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले. यावेळी ते बोलत होते.
ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला गेला आहे. आज ठाणे झपाट्याने विकसित होत आहे. शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु असून अनेक विकासकामे वेगाने मार्गी लागत आहेत. विकासासाठी कधीही निधी कमी पडू नये, हे माझे ठाम धोरण आहे. कोणतीही कारणे न देता, आवश्यक निर्णय त्वरित घेणे (नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन ) हीच माझी कार्यशैली आहे. ठाण्याचा कोस्टल रोड आणि नियोजित मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. या सर्व योजनांचा उद्देश ठाणेकरांना अधिक सुबक, सुलभ आणि सक्षम नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.ठाण्यातील विविध भागात सुंदर अशी उद्याने उभारली जात आहेत. यामुळे ठाण्याचे चित्र बदलले आहे. तर ठाण्यात क्लस्टर प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होतो आहे. यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सोयी सुविधांचा लाभ घेता येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
कोपरी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून पिण्यायोग्य शुध्द पाणी उपलब्ध होणार आहे. या पाण्याचा उपयोग बांधकाम, शहरातील झाडांना देणे तसेच शहरातील ज्या व्यावसायिक इमारती आहेत, त्यातील स्वच्छतागृहांमध्ये वापरणे शक्य होणार आहे. यामुळे शहरतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्यात देखील मोठी बचत होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. खंडू रांगणेकर बॅडमिंटन सभागृहाची नव्याने उभारणी करण्यात आली असून या ठिकाणी एकूण १० बॅडमिंटन कोर्ट तयार झाले आहेत. त्याचे लोकार्पण करण्यात आले. तसेच जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद दिघे यांचे स्मारकाचे भूमिपूजन, ठाणे रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसराचे सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन, कोपरी येथील कन्हैयानगर उद्यान लोकार्पण, सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि शेठ लखमीचंद फतीचंद प्रसूतिगृहाचे लोकार्पण ही यावेळी पार पडले.
टप्प्यात आले की कार्यक्रम करतो
दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये शूटिंग रेंजची उभारणी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी योग्य सराव करून अतिशय अचूक असा निशाणा साधला आहे. कारण मला माहिती आहे टप्प्यात आला की कसा कार्यक्रम करायचा. अशी मिश्किल प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला टोला लगावला.