ठाणे : ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाविरोधात स्थानिक रहिवाशांनी आंदोलन केल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांसोबत एक बैठक आयोजित केली होती. मंगळवारी सायंकाळी ही बैठक पार पडणार होती. मात्र, बैठकीच्या काही तास आधी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी कामात व्यस्त असल्यामुळे हि बैठक रद्द केली. यामुळे आंदोलनकर्त्यांना आता बैठकीसाठी पुढची तारीख दिली जाणार आहे.
राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे -बोरीवली भुयारी मार्गाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू झाले आहे. हा भुयारी मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगराखालून काढण्यात येणार असून त्याचे एक टोक ठाण्यातील मानपाडा येथील मुल्लाबाग भागात निघणार आहे. हा परिसर निसर्गाने नटलेला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामुळे येथे मोठा हरित पट्टा आहे. याच भागात निळकंठ वुडस, निळकंठ ग्रीन, व्हेराटन, काॅसमाॅस लाउंज, सत्यशंकर अशी मोठी गृहसंकुले आहेत. याठिकाणी सुमारे १२ हजाराहून अधिक नागरिक राहत आहेत. या नागरिकांनी येथील निसर्गाचे सौंदर्य पाहूनच घरे विकत घेतली होती. मात्र, ठाणे -बोरीवली भुयारी मार्गाच्या कामामुळे येथील जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवून हरित पट्टा नष्ट करण्यात आला आहे. त्याचबरोबर डम्परद्वारे होणाऱ्या वाहतूकीमुळे धुळ प्रदुषणात वाढ झाल्याने नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मार्गाचा पथकर नाका संकुलांच्या प्रवेशद्वारेजवळ उभारला जाणार आहे. त्याचा त्रास येथील रहिवाशांना होणार आहे. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी शनिवारी रस्त्यावर उतरून उत्स्फुर्तपणे आंदोलन केले होते. भुयारी मार्ग रस्ते मार्गाऐवजी मुल्लाबाग ते युनी अबेक्स कंपनीपर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. तसेच एमएमआरडीए अधिकारी जोपर्यत याबाबत निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला होता. दरम्यान, ठाणे पोलिसांनी मध्यस्थी करत एमएमआरडीए अधिकारी आणि रहिवाशांची मंगळवारी सायंकाळी एक बैठक आयोजित केली होती. मात्र, बैठकीच्या काही तास आधी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी कामात व्यस्त असल्यामुळे हि बैठक रद्द केली.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली आहे. यामुळे ठाणे बोरिवली भुयारी मार्गासंबंधीत मंगळवारी सायंकाळी ५ वाजता कॉसमॉस आणि इतर परिसरातील राहिवाशांसोबत आयोजित करण्यात आलेली बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. या बैठकीची तारीख आणि वेळ प्राधिकारणामार्फत लवकरच कळविण्यात येईल, असा संदेश एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी पाठविला असल्याचे रहिवाशांनी सांगितले.