ठाणे : सहा महिन्यांपूर्वी छुप्या पद्धतीने बांगलादेशातून आलेल्या महिलांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. या महिला वागळे इस्टेटमध्ये वास्तव्यास होत्या. त्यांच्याविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर बेकायदेशीररित्या भारतात राहणाऱ्या बांगलादेशींचा मुद्दा ऐरणीवर आला होता. सैफ वरील हल्लेखोराला ठाणे शहरातील हिरानंदानी येथील कांदळवनातून अटक झाली होती. त्यानंतर ठाणे शहरात राहणाऱ्या बांगलादेशींवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. असे असले तरी बांगलादेशी घुसखोरांचे प्रमाण अद्यापही कायम आहे.
भिवंडी, ठाणे शहरात बांगलादेशी वास्तव्य करत आहेत. वागळे इस्टेट या भागात दोन बांगलादेशी महिला वास्तव्य करत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट पाचला मिळाली होती. त्यानंतर पथकाने याबाबत तपास केला असता, दोन महिला वागळे इस्टेट येथील शांतीनगर परिसरात राहत असल्याचे समोर आले. युनीट पाचच्या महिला पथकाने बांगलादेशी राहत असलेल्या घरात प्रवेश केला. त्यावेळी बांगलादेशातील जौशर आणि बेनापूर भागातून छुप्या पद्धतीने भारतात आलेल्या दोन तरुणी पथकांना आढळून आल्या. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी सहा महिन्यांपूर्वीच भारतात प्रवेश केल्याची कबूली दिली.
भारतात प्रवेश केल्यानंतर त्यांनी वागळे इस्टेट गाठले. येथील एका व्यक्तीचे घर त्यांनी भाड्याने राहण्यास घेतल्याची कबूली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल आणि रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी बुधवारी श्रीनगर पोलीस ठाण्यात विदेशी व्यक्ति अधिनियम, १९४६ चे कलम १३, १४(अ), १४ (ब) तसेच पारपञ (भारतात प्रवेश) अधिनियम, १९२० चे कलम ३, ४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.