ठाणे : ठाणे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कंत्राटदारांनी कामे केली आहेत. मात्र, त्यांना अद्याप त्यांची देयके देण्यात आलेली नाहीत. या मागणीसाठी कंत्राटदारांकडून सातत्याने आंदोलन करण्यात येत आहेत. यानंतरही त्यांना देयके मिळालेली नाहीत. त्यामुळे ठेकेदारांनी मंगळवारी पुन्हा आंदोलन केले आणि यावेळी संतप्त झालेल्या ठेकेदारांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वाढदिवस आनंदाने दिवस साजरे करावेत पण, शेतकऱ्यांप्रमाणे आम्हीही आत्महत्या करायच्या का?, असा सवाल उपस्थित केला.
राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत राज्यातील ठेकेदार कामे करीत आहेत. परंतु त्यांना या कामाची सुमारे ९० हजार कोटी रूपयांची देयके रखडली आहेत. ही देयके मिळावीत यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाकडून पाठपुरावा सूरू आहे. त्यातच आता या देयकांमध्ये जल जीवन मिशनच्या देयकांचाही समावेश झाला आहे. ही देयके तात्काळ देण्यात यावीत, यासाठी मंगळवारी मोर्चा काढण्यात आला होता. नाहीत. राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चेकऱ्यांनी शासनाचा निषेध केला. तसेच, हातात फलक घेऊन शेतकऱ्यांप्रमाणे आम्हीही आत्महत्या करायच्या का? असा ठेकेदारांनी उपस्थित केला. या आंदोलनात कल्पेश केणी, भगवान भोईर, पिन पाटील, आकाश आव्हाड, अनंता पवार, अनिकेत ढालपे, कौस्तुभ राणे, काशिनाथ मुरबाडे, विक्रांत देशमुख, राणा ढोले, अनिल नलावडे, चेतन शिंदे, अविनाश तिवरेकर आदी सहभागी झाले होते.
काय प्रकरण आहे
कामाची देयके मिळविण्यासाठी आम्ही गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष करीत आहोत. तरीही आमची ९० हजार कोटी रूपयांची देयके अदा करण्यात आलेली नाहीत. आता ठाणे जिल्ह्यात जलजीवन योजनेंतर्गत ७४० कामे करण्यात आली. ७४० गावांतील घराघरात ठेकेदारांनी पाणी पोहचविण्याचे काम केले. ही योजना राज्य आणि केंद्र सरकारकडून राबविण्यात येत आहे. आम्ही वर्षभर काम केल्यानंतर केंद्राने हात वर केले आहेत. तर राज्य सरकार काहीही भाष्य करायला तयार नाही.
एकीकडे सरकारी बाबू धोरणे बदलत आहेत आणि दंडही ठेकेदारांनाच लावत आहे. आम्ही अनेकदा निवेदने दिली आहेत. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळेच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वाढदिवस साजरे करीत आहेत. त्यांनी आनंदाने दिवस साजरे करावेत, दिवाळी करावी. पण, आम्हाला काळी दिवाळी साजरी करावी लागत आहे, त्याचे काय? आम्हीही शेतकऱ्यांप्रमाणे आम्हीही आत्महत्या करायच्या का? असा प्रश्न राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांनी उपस्थित केला आहे.