ठाणे : मुंबई उपनगरातील भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेने काही रेल्वेगाड्यांची वाहतुक स्थगित केल्या होत्या. या रेल्वेगाड्या विशेष लोकल म्हणून पुन्हा ठाणे, कल्याणच्या दिशेने सोडल्या जात होत्या. परंतु मुंबईत कामानिमित्ताने निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि जलद मार्गिकेवरील फलाट क्रमांक सहावरून रेल्वेगाड्या सोडल्या जात नव्हत्या. त्यामुळे धिम्या मार्गिकेवरील फलाट क्रमांक चारवर प्रवाशांचा भार येऊन येथे गर्दी झाली होती. दिवा, कल्याण स्थानकातही प्रवाशांची गर्दी झाल्याने कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. काही प्रवाशांचे एकमेकांसोबत वाद घडत होते.
रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, वांगणीमध्ये सकाळपासून पाऊस पडत होता. असे असले तरी कामानिमित्ताने मुंबईत जाणारे नोकरदार सकाळपासूनच घराबाहेर पडले होते. त्यातच भायखळा ते सीएसएमटी रेल्वे स्थानका दरम्यान सकाळी रेल्वे रुळांवर पाणी साचले. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर झाला. सुरक्षेच्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने येथील रेल्वे सेवा कुर्ला, दादर आणि परळ रेल्वे स्थानकांपर्यंत स्थगित केली. परंतु ठाणे, डोंबिवली, कल्याण पल्ल्याडील रेल्वे प्रवाशांचे हाल झाले. सकाळी घराबाहेर पडलेला नोकरदार सीएसएमटी पर्यंत पोहचू शकला नाही. नाइलाजाने त्यांना पुन्हा घरची वाट धरावी लागली.
सकाळी ९ नंतर ठाणे रेल्वे स्थानकातही गर्दी वाढू लागली होती. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवरून ठाणे ते सीएसएमटी उपनगरीय रेल्वेगाडी सुटते. परंतु या फलाटावरून रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. फलाट क्रमांक सहावरुन मुंबईच्या दिशेने जलद रेल्वेगाडी जात असते. या फलाटावरूनही जलद रेल्वेगाड्यांची वाहतुक बंद होती. तर, ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक चारवर कल्याण, बदलापूर भागातून सुटणाऱ्या धिम्या रेल्वेगाड्या थांबतात. या फलाटावरून रेल्वे वाहतुक सुरु होती. त्यामुळे फलाट क्रमांक चार वर प्रवाशांचा भार आला होता. रेल्वे गाडी फलाटावर थांबण्यापूर्वीच प्रवासी या गाड्यांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे प्रवाशांचे एकमेकांसोबत वादाचे प्रसंग उद्भवत होते. महिला, वृद्ध, बालकांचे प्रवासा दरम्यान हाल झाले.
कल्याण आणि दिवा रेल्वे स्थानकातही प्रवाशांची गर्दी झाली होती. कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये दिवेकर शिरण्याचा प्रयत्न करत होते. तर रेल्वेगाड्यांमधील प्रवासी गर्दीमुळे त्यांना आत शिरु देत नव्हते. रेल्वे डब्यांमध्ये गर्दी वाढल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता.