ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक झपाट्याने वाढलेला भाग म्हणजे घोडबंदर पट्टा. गेल्याकाही वर्षांपासून घोडबंदर भागात नागरिकरण वाढत असताना हा भाग आता अपघाताचे केंद्र देखील ठरू लागला आहे. रस्त्यांची सुरु असलेली कामे, असमान झालेले रस्ते यामुळे येथून वाहतुक करताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. त्यात येथून जड-अवजड वाहनांची भरधाव वाहतुक यामुळे जीवघेणा प्रवास आता नकोसा झाल्याचे येथील रहिवासी म्हणत आहेत. विशेष म्हणजे, मागील पाच महिन्यात म्हणजेच, जानेवारी ते मे महिन्यांच्या कालावधीत ३१ जणांचे अपघात झाले. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे घोडबंदर मार्ग अपघातांचे केंद्र ठरत असल्याचे चित्र आहे.
घोडबंदर मार्ग हा ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक वेगाने वाढलेला क्षेत्र आहे. या भागाच्या एका दिशेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर दुसऱ्या भागात ठाण्याची विस्तीर्ण पसरलेली खाडी आहे. या दोन्हीच्यामधून घोडबंदर मार्ग जातो. तसेच घोडबंदर मार्गालगत लोकवस्ती देखील मोठ्याप्रमाणात वाढली आहे. इमारतींची उंची ३० ते ४० मजल्यापर्यंत गेली असताना लोकवस्तीसोबत वाहनांचा भारही या मार्गावर वाढला आहे. या नागरिकरणासोबतच आता अपघातांचे केंद्र देखील घोडबंदर ठरत आहे. घोडबंदर मार्गावर गायमुख, ओवळा, ब्रम्हांड, वाघबीळ, आनंदनगर, कापूरबावडी हे महत्त्वाचे चौक आहेत. या चौकांपैकी गायमुख, ओवळा सिग्नल, ब्रम्हांड चौक, वाघबीळ आणि कापूरबावडी चौकातील तत्त्वज्ञान विद्यापीठ हा परिसर अपघात प्रवण क्षेत्र झाला आहे. त्यामुळे चौका-चौकात अपघाताचे हे सापळे निर्माण झाले आहे. मार्गावर मागील पाच महिन्यांत ३१ जणांच्या अपघातांची नोंद झाली आहे. अपघातांमध्ये सात जणांना प्राण गमवावा लागला. यातील बहुतांश दुचाकीस्वार आहेत. तर गंभीर जखमी होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे.
घोडबंदरची स्थिती काय?
घोडबंदर मार्गावर वडाळा-घाटकोपर- कासावडवली या मेट्रो चार आणि कासारवडवली ते गायमुख चार अ या मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू आहेत. या कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठिकठिकाणी मार्गावरोधक उभारले आहेत. त्यातच सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यात सामावेश करण्याचे नवे कार्य देखील एमएमआरडीएकडून सुरू झाले आहे. महापालिकेची देखील ठिकठिकाणी खोदकामे सुरू आहेत. त्यामुळे घोडबंदर मार्ग रस्त्यापेक्षा खोदकामाचा मार्ग अधिक झाला आहे. या कामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत.
विरुद्ध दिशेने धोकादायक वाहतुक
रस्ते खोदकामामुळे दुचाकी किंवा हलक्या वाहनांना सुरक्षित पर्याय असलेला सेवा रस्ता अनेक ठिकाणी बंद झाला आहे. रस्त्याच्या एकादिशेला राहणारे दुचाकी चालक आर माॅल, मानपाडा, वाघबीळ भागात धोकादायकरित्या विरुद्ध दिशेकडील वाहिनीवरून वाहने चालवित असल्याचे चित्र आहे.
कुठे किती अपघात
घोडबंदर ब्रम्हांड सिग्नल येथे एक जण गंभीर जखमी झाला. तसेच गायमुख येथे दोघांचा मृत्यू, ओवळा सिग्नल येथे दोघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी आणि ११ किरकोळ जखमींची नोंद आहे. वाघबीळ येथे एक मृत्यू, दोन गंभीर आणि एक किरकोळ मृत्यूची नोंद आहे. तसेच तत्त्वज्ञान विद्यापीठ आणि कापूरबावडी येथे एक मृत्यू, एक गंभीर जखमी आणि पाच किरकोळ जखमींची नोंद आहे. तसेच मानपाडा येथील आर माॅल भागात एकाच्या मृत्यूची नोंद आहे.
घोडबंदर मार्गावर एकाचवेळी मेट्रो, घोडबंदर रस्त्याचे मुख्य रस्त्यात सामावेश करणे आणि उड्डाणपूल निर्माणाचे काम सुरू आहे. एकाच वेळी ही तिन्ही कामे करणे गरजेचे नव्हते. कामे करायची होती तर ती टप्प्याटप्प्याने करायला हवी होती. घोडबंदर आता मृत्यूचा सापळा ठरत आहे. अवजड वाहने देखील अवेळी सोडली जातात. तसेच घोडबंदरच्या मुख्य रस्त्यालगतच्या सेवा रस्त्यांचा हलक्या वाहन चालकांकडून वापर होत होता. परंतु हा सेवा रस्ताच मुख्य रस्त्यात सामाविष्ट केला जाणार असल्याने मोठी समस्या येथे निर्माण होणार आहे. – गिरीश पाटील, समिती सदस्य, जस्टीस फाॅर घोडबंदर रोड.
याबाबत वाहतुक पोलीस दलातील एका अधिकाऱ्याला विचारले असता, वाहन चालविताना अनेकदा ट्रकच्या जवळ दुचाकीस्वार वाहतुक करत असल्याने अपघात होतात असे स्पष्ट झाले आहे. ट्रक चालकाच्या अगदी जवळ दुचाकीस्वार दुचाकी चालवित असल्यास ट्र चालकास वाहनाच्या आरशामध्ये तो दुचाकी चालक दिसत नाही. काही प्रकरणांमध्ये दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे समोर आले आहे. तसेच बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई सुरू असते अशी माहिती त्यांनी नाव छापू नये या अटीवर सांगितली.
यासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी तथा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष अशोक शिनगारे यांना वारंवार संपर्क साधून आणि लघु संदेश पाठवूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. दरवर्षी राज्यात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित केला जातो. या रस्ता सुरक्षा सप्ताहात जनजागृती केली जाते. अपघात कमी करणे हे या सप्ताहा मागील उद्धिष्ट असते. त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. परंतु अशा कार्यक्रमांतून वाहन चालकांमध्ये जनजागृती निर्माण होते की नुसतेच कार्यक्रम राबविले जातात असा प्रश्न उपस्थित होत आहे.