ठाणे : ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीपासून पाच मिनीटांच्या अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर तलावातील मासे मृत पावल्याच्या घटना दोनदा घडल्या असून या घटनेनंतर टिकेचे धनी ठरलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने तलावातील मासे मरू नयेत यासाठी उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. तलावात सांडपाणी येणारी सहा ते सात ठिकाणे बंद करण्याबरोबरच पाणी स्वच्छ करण्यात येणार आहे.
ठाणे महापालिकेचे मुख्यालय पाचपखाडी परिसरात आहे. येथूनच पाच मिनीटांच्या अंतरावर सिद्धेश्वर तलाव आहे. या तलावात २४ एप्रिल रोजी मासे मृत पावले होते. त्यानंतर ११ मे रोजी पुन्हा तलावातील मासे मृत पावले होते. सिद्धेश्वर तलावाचे क्षेत्र २ हेक्टर असून या तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणा बेकायदा चाळी आहेत. या चाळीतील सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारे बांधण्यात आली आहेत. ही गटारे तलावाजवळून जात असून या गटारातील सांडपाणी तलावात मिसळत आहे. सहा ते सात ठिकाणहून गटाराचे पाणी तलावात जात असल्याने तलावातील पाणी प्रदुषित होत आहे. यामुळेच पाण्यामध्ये शेवाळ वाढून विरघळलेला ऑक्सिजन कमी होऊन मासे मृत्युमुखी पडल्याची बाब पालिका प्रदुषण नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आली आहे. तलावातील मासे मृत पावण्याच्या घटना दोनदा घडल्यामुळे टिकेचा धनी ठरलेल्या पालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने तलावातील सांडपाणी रोखण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत.
काय आहेत उपाययोजना?
तलावामध्ये वायुवीजन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहेत. तलावामध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी १२ फ्लोटींग वेटलँड लावण्यात येत आहेत. तलावाच्या सभोवतालचे ४०० मीटरचे गटार तुंबले आहे, ते मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लावून स्वच्छ करण्यात येत आहे. तसेच तलावात येणारे सांडपाणी बंद करण्यात येत आहे. तलावाच्या पृष्ठभागावर वारंवार येणारे शेवाळ मनुष्यबळाद्वारे काढण्यात येत आहे. तलावाच्या पाण्यामध्ये विरघळलेला वायू वाढविण्यासाठी विशिष्ट प्रकारचे जैविक द्रव्य वांरवार टाकण्यात येत आहे. ज्या ठिकाणाहून नागरीक कचरा तलावात टाकत आहेत. तेथे तलावाच्या भिंती भोवती साखळी कुंपण (चेनलिंक फेन्सिंग) उभारण्यात येणार आहे. तलावाच्या पाण्याची पातळी उन्हाळ्यामुळे कमी होऊ नये म्हणून बोअरवेल नवीन खोदून पाणी टाकण्यात येत आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या मुख्य प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.