ठाणे : महात्मा फुले मंडईतील मसाला गिरण्यांमधून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी वाढल्यानंतर ठाणे महापालिकेने कारवाई करत सात गिरण्या सील केल्या आहेत. त्यामुळे आता उरलेल्या एका गिरणीत मसाला कुटण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून महिलांना दीड ते दोन तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांच्यामधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
उन्हाळ्याचा कालावधी हा मसाला बनविण्यासाठी उत्तम मानला जातो. त्यामुळे या कालावधीत मसाला गिरण्यावर मोठ्याप्रमाणात महिला वर्गाची गर्दी होत असते. ठाणे बाजारपेठेत महात्मा फुले मंडईमध्ये मसाला बाजार आहे. या बाजारात सात ते आठ मसाला गिरण्या आहेत. उत्तम पद्धतीने मसाला कुटून मिळत असल्यामुळे ठाणे शहरातीलच नाही तर, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण भिवंडी, मुलुंड घाटकोपर अशा विविध भागातून गेले अनेक वर्षांपासून नागरिक या मसाला बाजारात मसाला बनविण्यासाठी येतात.
परंतू, या बाजारात मोठ्याप्रमाणात मसाला गिरण्या सुरु असल्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवाशांनी महापालिकेल्या केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत महापालिकेने काही दिवसांपूर्वी या बाजारातील सात मसाला गिरण्या सील केल्या आहेत. सद्यस्थितीला या बाजारातील केवळ एकच मसाला गिरणी सुरु असून या एकाच गिरणीवर मसाला कुटण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांचा ताण वाढला आहे. सकाळी ८ वाजल्यापासून महिला या दुकानाबाहेर रांगा लावत आहेत. मसाला बनवून घेण्यासाठी दीड ते दोन तास उन्हात उभे राहावे लागत असल्यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत. ठाणे महापालिकेने लवकरात लवकर बंद केलेल्या मसाला गिरण्या सुरू कराव्या अशी विनंती महिला वर्गांकडून केली जात आहे.
ग्राहक प्रतिक्रिया
ठाण्यातील मसाला बाजारात उत्तम पद्धतीने मसाला तयार करुन मिळत असल्यामुळे गेले अनेक वर्षापासून मी डोंबिवलीहून ठाण्यात खास मसाला बनवून घेण्यासाठी येते. आधी याठिकाणी बऱ्याच गिरण्या होत्या. त्यामुळे मसाला पटकन दळून मिळायचा. परंतू, यंदा इतर गिरण्या बंद झाल्या असून केवळ एकच गिरणी सुरु असल्याचे समजले. पण, याठिकाणी ग्राहकांची गर्दी होत आहे. मी गेले दीड ते दोन तास रांगेत उभी होती त्यानंतर मला मसाला दळून मिळाला, अशी प्रतिक्रिया डोंबिवलीहून आलेल्या प्रियांका ब्रेंद्रे यांनी दिली. मसाला बनवून घेण्यासाठी नागरिक सकाळ पासून येऊन इथे रांगा लावत आहेत. या बाजारातील इतर गिरण्या सुरु असत्या तर, इतका त्रास आम्हाला झाला नसता. रांगेत उभे असलेल्यांमध्ये महिलांची मोठी संख्या आहे. त्यांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे महापालिकेने बंद केलेल्या मसाला गिरण्या सुरु कराव्या अशी विनंती घाटकोपरहून आलेल्या सुनील भाटकर यांनी केली आहे.