ठाणे – सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षांकरिता १.५ कि.मी. करिता किमान २६ रुपये इतक्या भाडेदरवाढीला मान्यता देण्यात आली. या निर्णयाच्या अनुषंगाने ठाणे परिवहन विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध शेअर रिक्षा मार्गांवरील भाडेदर नव्याने निश्चित करण्यात आले आहेत. मात्र काही रिक्षाचालकांकडून नव्याने निश्चित करण्यात आलेल्या दरांपेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांच्या मनमानी कारभारा विरोधात तक्रार करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून व्हाट्सॲप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई महानगरक्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या २३ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षांकरिता १.५ कि.मी अंतराकरिता किमान २६ रुपये इतक्या भाडेदरवाढीला मान्यता देण्यात आली. यानंतर सर्वत्र हे नियम लागू झाले. ठाणे तसेच कल्याण डोंबिवली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी रिक्षा वाहतूक होते. ठाणे शहरात हे प्रमाण सर्वाधिक आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा स्थानकातून शहरातील विविध ठिकाणी प्रवासी वाहतूक केली जाते. प्रत्येक ठिकाणांसाठी निश्चित भाडेदर ठरविण्यात आले आहेत. यानुसार काही रिक्षाचालक भाडे आकारात असतात. मात्र काही रिक्षाचालकांकडून मनमानी करून अतिरिक्त भाडे आकारण्यात येते. यामुळे प्रवाशांमध्ये आणि रिक्षाचालकांमध्ये वादाचे प्रसंग उदभवतात. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांना त्यांची रीतसर तक्रार करता यावी यासाठी परिवहन विभागाकडून रिक्षा चालकांच्या मनमानी कारभारा विरोधात तक्रार करण्यासाठी ९४२३४४८८२४ हा व्हाट्सॲप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

रिक्षा चालकांकडून जास्त भाडे आकारणे, जास्त प्रवासी वाहतूक करणे, भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, शिवीगाळ करणे, इत्यादी प्रकारचे नियमभंग केल्यास प्रवाशांना आता थेट मोबाईलद्वारे तक्रार दाखल करता येणार आहे. यासाठी ९४२३४४८८२४ व्हाट्सॲप क्रमांकावर तक्रार पाठवता येईल. तक्रार करताना गुन्हा घडलेले ठिकाण, दिनांक, वेळ, गुन्ह्याचे स्वरूप तसेच शक्य असल्यास संबंधित रिक्षाचे क्रमांक व फोटोसह सर्व तपशील पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवाशांनी पाठवलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन संबंधित रिक्षा चालकावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. नव्याने निश्चित झालेल्या भाडेदरांबाबत नागरिकांमध्ये स्पष्टता असावी यासाठी भाडेदराचे तक्ते संबंधित रिक्षा स्टँडवर लावण्यात आले आहेत. तरीही जर कुठेही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले, तर नागरिकांनी भीती न बाळगता व्हॉट्सॲपद्वारे तक्रार दाखल करावी, असे आवाहन ठाणे परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.