Thane Municipal Corporation, Thane water cut news / ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत असतानाच, ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. येत्या मंगळवारपर्यंत नागरिकांना अपुऱ्या प्रमाणात आणि अनियमित पाणीपुरवठा होणार असल्याचे सांगत ठाणे महापालिकेने त्या मागचे कारणही स्पष्ट केले आहे. या काळात पाण्याचा वापर जपून करावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६२१ दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज आहे. परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज ५९० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो.

त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ९० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यात तांत्रिक कारणामुळे टंचाई समस्येत वाढ होत आहे.

पाणी पुरवठ्यात कपात

ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा शहराच्या विविध भागात करते. त्यामुळे शहरातील हा पाण्याचा महत्वाचा स्रोत मानला जातो. या पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिका भातसा नदीच्या पात्रावरील पिसे बंधाऱ्यातुन पाणी उचलते आणि त्याचा शहरात पुरवठा करते. परंतु या पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे.

कपातीचे कारण काय ?

भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून पूर्ण क्षमतेने पंपिंग करण्यात अडचणी येत आहेत. तसेच, पाण्यातील अतिरिक्त गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवरही परिणाम होत आहे. या सगळ्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राकडे कमी प्रमाणात पाणी पुरवठा येत आहे.

पाण्याचा वापर जपून करा

मंगळवारपर्यंत नागरिकांना अपुऱ्या प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होईल, असे ठाणे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. पिसे येथील पंपाच्या स्टेनरमधील गाळ, कचरा, झाडाच्या फांद्या काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी कृपया या काळात पाण्याचा वापर जपून करावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.