ठाणे – जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी, पुरेशा प्रमाणात पाऊस पडत नसल्यामुळे वातावरणात उकाडा कायम आहे. वातावरणातील या बदलांमुळे नागरिक हैराण झाले असतानाच, त्यापाठोपाठ आता, भाज्या आणि पालेभाज्यांच्या पिकांवर परिणाम होऊन त्याची आवक घटल्याचे दिसून येत आहे. परिणामी, गेल्या आठवड्याभरापासून भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे. काही भाज्यांनी किरकोळ बाजारात थेट शंभरी गाठली आहे. येत्या काही दिवसात भाज्यांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता किरकोळ विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

जून महिन्याच्या पंधरावड्यानंतर अपेक्षित पावसाला सुरुवात झालेली नाही. दिवसभरात अर्ध्या तासांच्यावर पाऊस पडत नाही. पाऊस पडल्यानंतर पुन्हा ऊन पडते. सलग पाऊस पडत नसल्याने वातावरणात मोठे बदल झाले असून उकाडा वाढल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी आणि त्यानंतर पडणारे कडक उन या बदलत्या वातावरणाचा परिणाम भाज्यांच्या पिकांवर होऊ लागला आहे. यामुळे गेल्या आठवड्याभरापासून भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे. काही भाज्यांनी किरकोळ बाजारात थेट शंभरी गाठली आहे. येत्या काही दिवसात भाज्यांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता किरकोळ विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – तुरुंगात जावे लागत असेल तर कंपनीच बंद करू, डोंबिवली एमआयडीसीतील युवा उद्योजकांची उव्दिग्नता

वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून भाज्या विक्रीसाठी दाखल होत असतात. सर्वाधिक भाज्या या पुणे आणि नाशिक जिल्ह्यातून येतात. परंतु, या वातावरणातील बदलाचा परिणाम भाज्यांच्या पिकांवर झाला आहे. उकाड्यामुळे भाज्यांचे पीक खराब झाले असून बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. भाज्यांची आवक घटल्यामुळे त्यांच्या दरात गेल्या आठवड्याभरापासून मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात १० ते २० रुपयांनी तर, किरकोळ बाजारात दुपटीने भाज्यांचे दर वाढले आहेत. भेंडी, गवार, शिमला मिरची, तोंडली या भाज्यांनी किरकोळ बाजारात थेट शंभरी गाठली आहे.

वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यात विविध भागांतून दररोज ५५० ते ६०० भाज्यांच्या गाड्यांची आवक होत असते. यामध्ये पुणे आणि नाशिक जिल्ह्यातून येणाऱ्या गाड्यांची संख्या मोठी असते. गेल्या आठवड्याभरापासून गाड्यांच्या संख्येत घट झाली आहे. सध्या केवळ ४०० ते ४५० भाज्यांच्या गाड्या बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे कृषी उत्त्पन्न बाजार समितीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीत साथरोग नियंत्रणासाठी फवारणी मोहीम

पालेभाज्यांच्या दरातही वाढ

या वातावरणामुळे पालेभाज्यांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून त्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात १५ ते २० रुपयाने विक्री केली जाणारी मेथीची जुडी ३५ ते ४० रुपयांनी विक्री केली जात आहे. तर, पालकची जुडी ५० रुपयाने विक्री केली जात आहे. कोथिंबीरीच्या जुडीने थेट शंभरी गाठली आहे, अशी माहिती ठाण्यातील किरकोळ भाजी विक्रेते विनोद जयस्वाल यांनी दिली.

व्यापाऱ्यांचे म्हणणे…

राज्यात सलग आणि मुबलक प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली नाही. अद्यापही उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लगत आहे. त्याचा परिणाम, भाज्यांच्या पिकांनाही बसला असून कडक उन्हामुळे भाज्यांची पिके खराब झाली आहेत. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटून त्यांच्या दरात वाढ झाली आहे. पाऊस नियमितपणे सुरु झाल्यानंतर भाज्यांची आवक सुरळित होण्याची शक्यता आहे, अशी माहिती वाशी कृषी उत्त्पन्न बाजार समितीतील भाजी व्यापारी नाना बोरकर यांनी दिली.

भाज्यांचे दर (प्रति किलो)

भाज्या घाऊक

आठवड्याभरापूर्वी – आता

भेंडी – ४४ – ४८
फरसबी – ८० – १००
गवार – ५० – ९०
शिमला मिरची – ४२ – ७०
वांगी – २४ – ४०
पडवळ – ३८ – ६०
तोंडली – ४० – ५०
टोमॅटो – २२ – ४०

किरकोळ

आठवड्याभरापूर्वी – आता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भेंडी – ८० – १००
फरसबी – १०० – १२०
गवार – ८० – १००
शिमला मिरची – ८० – १००
वांगी – ४० – ६०
पडवळ – ६० – ८०
तोंडली – ८० – १००
टोमॅटो – ५० – ८०