ठाणे : टोईंग वाहनाद्वारे दुचाकींवर होणाऱ्या कारवाईचा वाद ठाण्यात पेटला असताना वाहतुक पोलिसांनी ठाणे वगळता मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, भिवंडी आणि विठ्ठलवाडी भागात टोईंग वाहनाद्वारे कारवाईला सुरुवात केली आहे. टोईंग कारवाई करताना ती बेकायदेशीरित्या होत असल्याचा आरोप झाल्याने मागील सात ते आठ महिन्यांपासून टोईंगद्वारे कारवाया बंद होत्या. ठाणे शहरात टोईंग वाहनाद्वारे होणाऱ्या कारवाईला प्रचंड विरोध झाल्याने ठाणे वाहतुक पोलिसांनी ठाणे वगळता इतर भागात टोईंग वाहनाद्वारे कारवाई सुरु केली आहे.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात रस्त्याकडेला बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या दुचाकींवर ठाणे वाहतुक पोलिसांकडून टोईंग वाहनांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. टोईंग वाहनांच्या कंत्राटदारांकडून अनेकदा नियमबाह्य पद्धतीने वाहने उचलली जातात. त्यामुळे टोईंग वाहनांवर काम करणारे कर्मचारी आणि वाहन चालक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवितात. अनेकदा हे प्रकरण शिवीगाळ आणि हाणामारी पर्यंत येत असते. त्यासंदर्भातील चित्रीकरण देखील विविध समाजमाध्यमांवर प्रसारित आहेत.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील टोईंग वाहनांचे करार दरवर्षी केले जातात. आयुक्तालय क्षेत्रात अशापद्धतीने सुमारे ३० टोईंग वाहने धावत होती. या वाहनांचा टोईंग वाहनांचा करार नोव्हेंबर २०२४ मध्ये संपुष्टात आला होता. ठाणे स्थित अजय जेया यांनी टोईंग वाहनाद्वारे केली जाणारी कार्यपद्धती पारदर्शक नसल्याचा आरोप करत पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंंतर टोईंग वाहनांद्वारे कारवाया बंद झाल्या होत्या.
काही दिवसांपूर्वीच ठाणे वाहतुक पोलिसांनी टोईंग वाहन पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यास अजय जया यांच्यासह ठाण्यातील काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. ठाणे वाहतुक पोलिसांच्या कार्यालयासमोर आंदोलन देखील झाले होते. अखेर ठाणे पोलिसांनी ठाणे वगळता मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, विठ्ठलवाडी या भागात टोईंग सुरु केल्या आहेत. त्यामुळे या भागात आता टोईंग व्हॅनद्वारे रस्त्यालगत बेकायदेशीररित्या उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांवर कारवाई होणार आहे.
मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, विठ्ठलवाडी भागात टोईंग व्हॅनद्वारे कारवाई सुरु केली जात आहे. नियमानुसार, या टोईंग व्हॅनवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. – पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा.