ठाणे: मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूल परिसरात पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले. बुधवारी दुपारी येथील खड्डे बुजविण्याचे काम सुरु असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. वाहन चालकांना पाच ते दहा मिनीटांच्या अंतरासाठी अर्धा तास लागत होता.
वाहतुक कोंडीमुळे चालकांच्या नाकी नऊ आले होते. मुंबई नाशिक महामार्गावर मागील वर्षी खड्ड्यांमुळे चालकांना मन:स्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे यावर्षीही खड्डेकोंडीचा ताप सहन करावा लागेल का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
मुंबई नाशिक महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या मार्गावरून अवजड वाहनांची देखील वाहतुक होते. त्यामुळे वाहतुकीचा भार मार्गावर असतो. पावसाळ्यात दरवर्षी येथे खड्डे पडत असतात. यावर्षी देखील खड्ड्यांचे सत्र सुरू झाले. त्यासोबतच, आता कोंडी देखील होऊ लागली.
पावसामुळे येथील साकेत पूल परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडले होते. त्यामुळे बुधवारी दुपारी येथील खड्डे बुजविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू होते. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर झाला. माजिवडा, साकेत, खारेगाव टोलनाका ते भिवंडी येथील दिवे अंजुर परिसरात वाहतुक कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे वाहन चालकांचे हाल झाले. अवघ्या १० ते १५ मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना पाऊण तास लागत होता.