ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील वृक्षांच्या धोकादायक फांद्या छाटणीची कामे सर्वत्र सुरू असतानाच, गेल्या चोवीस तासात शहरात दोन ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याची घटना उघडकीस आली आहे. यातील एका घटनेत वृक्ष पडून कारचे नुकसान झाले आहे तर, दुसऱ्या घटनेत पडलेले वृक्ष बाजूला करताना अग्निशमन दलाचा जवान जखमी झाला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार घडत असून यात जिवितहानी तसेच वित्तहानीचे प्रकार घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी पालिकेने शहरातील वृक्षांच्या धोकादायक फांद्या छाटणीची कामे सर्वत्र सुरू केली आहे. फांद्या छाटणीमुळे वृक्षांचा समतोल जाऊ नये याची काळजी घेण्यात येत आहेत. याशिवाय, धोकादायक वृक्ष आढळून आल्यास ते हटविण्याची कारवाई करण्यात येत आहे. असे असतानाच, शहरात दोन ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली आहेत. बुधवारी ३० एप्रिल रोजी रात्री सव्वा नऊ ते साडे नऊ वाजण्याच्या सुमारास लुईसवाडी भागातील राजहंस सोसायटीच्या आवारातील एक सुकलेले वृक्ष पडले. येथे उभ्या केलेल्या एका कारवर हे वृक्ष पडून तिचे नुकसान झाले. यात, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरी घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. वागळे इस्टेट परिसरातील

कशिश पार्क या परिसरातील मोकळ्या जागेत एक वृक्ष पडले. या दोन्ही घटनांची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने धाव घेत, पडलेली झाडे कापून एका बाजूला केले. तर, कशीश पार्क येथे पडलेले वृक्ष कापून बाजुला करताना ठाणे महापालिका अग्निशमन दलाचे जवान किरण चौरे हे जखमी झाले आहेत. त्यांच्या उजव्या पायाच्या पंज्याला दुखापत झाली आहे, अशी माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, रुग्णालये, उद्याने, चौक, बस स्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्याची छाटणी करण्यात येत आहे. पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क होवून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टीने ही छाटणी केली जात आहे. यावर्षी नियोजित वेळेच्या दोन महिने आधीपासूनच धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहीमेची सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ६३६७ झाडांपैकी २७५३ झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात आल्या आहेत. हे प्रमाण सरासरी ४५ टक्के एवढे आहे.