डोंबिवली- खड्ड्यांमुळे वाहने संथगती चालवली जात असल्याने कल्याण-शिळफाटा रस्ता शनिवारी सलग सहाव्या दिवशी वाहन कोंडीत अडकला आहे. वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. या भागातील शाळकरी विद्यार्थ्यांना आता कोंडीचा फटका बसू लागल्याने पालक, शिक्षक हैराण आहेत.
काटई नाका ते शिळफाटा चौक, काटई-बदलापूर काटई नाका, मानपाडापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असल्याने प्रवासी जागीच अडकून पडले आहेत. दुपारी चार वाजता शिळफाटा नाका येथून डोंबिवलीकडे येण्यासाठी एक ते दीड तास लागत होता, असे प्रवाशांनी सांगितले. वाहतूक पोलिसांनी या रस्त्यावरील खड्डे तात्पुरते बुजवून वाहतूक सुरळीत होईल यादृष्टीने प्रयत्न चालविले आहेत. वाहनांची संख्या आणि भार अधिक असल्याने खडीने बुजविलेले खड्डे खराब होतात. ही खडी रस्त्यावर आली की पुन्हा ती वाहतुकीला अडथळा ठरते. खड्डे सिमेंट गिलाव्याने बुजविणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित यंत्रणा पुढाकार घेत नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

कल्याण-शिळफाटा रस्त्यालगत काटई, कोळे, लोढा हेवन, पलावा वसाहतींमध्ये बालवर्गापासून ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत शाळा आहेत. कल्याण, डोंबिवली, या भागातील नवीन वसाहतींमुळे मुले येथील शाळा, महाविद्यालयात दररोज शालेय बस, खासगी वाहनांनी येतात. त्यांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे. शाळेत आणि घरी विद्यार्थी वेळेत पोहचत नसल्याने पालक, शिक्षक नाराज आहेत. काही शाळा चालकांनी स्थानिक आमदार, रस्ते प्राधिकरणांना पत्रे लिहून शालेय बस मार्गातील खड्डे तात्काळ भरण्याची मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहाटे पाच ते रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत वाहतूक कोंडीमुळे रस्त्यावर कर्तव्यावर राहावे लागत असल्याने वाहतूक पोलीस त्रस्त झाले आहेत. अपुरे वाहतूक पोलीस आणि त्या तुलनेत वाहनांचा भार अधिक असल्याने प्रत्येक चौक, मार्गात वाहतूक पोलीस तैनात करणे शक्य होत नाही. अनेक वाहन चालक रस्ता दुभाजक फुटल्याच्या तेथून घुसून वाहतूक कोंडीत भर घालत आहेत, अशी माहिती वाहतूक अधिकाऱ्यांनी दिली. शिळफाटा रस्त्यालगत अनेक पेट्रोल पंप आहेत. पंपाच्या दिशेने जाणारी आणि बाहेर पडणारी वाहने मार्गिका मिळत नसल्याने रस्त्यात आडवी येतात. त्यामुळे कोंडी होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व रस्ते बांधकाम, नियंत्रण यंत्रणांना खड्डे बुजविण्याचे आदेश देऊनही या यंत्रणा तत्परतेने खड्डे बुजविण्याची कामे सुरू करत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.