लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई ठाणे मतदारसंघ शिंदे गटाकडे गेल्यामुळे नाराज झालेल्या नवी मुंबई आणि मिरा-भाईंदरमधील गणेश नाईक समर्थकांनी गुरुवारी आक्रमक भूमिका घेत मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात निदर्शने केली व सामुदायिक राजीनामे दिले. त्यामुळे प्रचाराला कमी कालावधी उरला असताना मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात महायुतीमधील बेबनाव समोर आला आहे.

ठाण्यातून नरेश म्हस्के यांना बुधवारी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी नाईकांनी त्यांच्या खैरणे येथील कार्यालयात बैठक घेतली. यावेळी आक्रमक झालेल्या नाईक समर्थकांनी मुख्यमंत्री आणि म्हस्के यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. बैठक सुरु असताना नाईकांची भेट घेण्यासाठी आलेल्या प्रताप सरनाईक आणि म्हस्के यांच्या समोरच घोषणाबाजी झाली व त्यांना भेटण्यास पदाधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यानंतर नाईकांनी आपल्या विशेष कक्षात त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सरनाईक व म्हस्के मागील दाराने परत गेले. नाईक यांच्या कडव्या समर्थक माजी नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी ‘उमेदवारी डावलणे म्हणजे हा ठाण्यात बसून नवी मुंबईचा घास घेण्याचा प्रकार आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे मुंबईतील प्रदेश भाजपचे मुख्यालय गाठले व आपला राजीनामे सादर केले. पाचशेपेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय सहसंघटन मंत्री सजीश जी. यांच्याकडे राजीनामे सादर केल्याचे नवी मुंबई भाजपचे उपाध्यक्ष रविंद्र इथापे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात नरेश म्हस्के यांचा किमान दोन लाख मतांनी पराभव होईल, असा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा >>> ठाकरे, पवार यांना धडा शिकवायलाच हवा होता !

मंदा म्हात्रेंची वेगळी चूल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाईक समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली असतानाच बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मात्र नवी मुंबई भाजप नरेश म्हस्के यांच्या पाठीशी असल्याचा दावा केला. राजीनामे देणारे नाईक समर्थक होते. संपूर्ण भाजपचा म्हस्केंना विरोध आहे असे समजण्याचे कारण नाही, असे त्या म्हणाल्या. भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात धरणे धरत नाईक समर्थक पदाधिकाऱ्यांनी ठाण्याची जागा भाजपला मिळावी यासाठी आग्रह धरला.