लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याणमधील चक्कीनाका भागातील बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आठ गुन्हे दाखल विशाल गवळी याने गेल्या आठवड्यात तळोजा कारागृहातील स्वच्छतागृहात टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशालच्या कुटुंबीयांनी या आत्महत्येप्रकरणी संशय घेऊन न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

विशालला तुरुंग प्रशासनाकडून त्रास दिला जात होता. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली नाहीतर त्याच्या बाबतीत काही तरी संशयास्पद घडले आहे, अशी तक्रार विशालची आई इंदिरा गवळी यांनी माध्यमांशी बोलताना केली. विशालने आत्महत्या केल्यानंतर तळोजा तुरुंगात विशालला पाहण्यासाठी तुरुंग प्रशासनाच्या परवानगीने त्याचे काका घटना घडल्याच्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी त्यांनाही घडल्या प्रकाराबद्दल संशय आला. त्यामुळे विशाल गवळीच्या आत्महत्येबद्दल विशालचे कुटुंबीय साशंक असल्याने त्यांनी याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे, अशी माहिती विशालचे वकील ॲड. संजय धनके यांनी माध्यमांना दिली.

विशालच्या आत्महत्येनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यावरून कोणत्याही प्रकार वाद होऊ नये म्हणून रुग्णालय, पोलीस प्रशासनाने कमालीची गुप्तता बाळगली होती. आत्महत्येनंतरच्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास जे. जे. रुग्णालयातून शवविच्छेदन झाल्यानंतर विशालचा मृतदेह विठ्ठलवाडी स्मशानभूमीत आणून कुटुंबीयांच्या उपस्थितीत विशालवर अंत्यसंस्कार करण्यात आले. विशालच्या कुटुंबीयांनी टाॅवेलने गळफास कसा काय घेतला जाऊ शकतो, असेही प्रश्न उपस्थित केले आहेत.

बदलापूर येथील एका शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलीस चकमकीत मारला गेला होता. असा प्रकार विशाल गवळीच्याबाबतीत होऊ नये म्हणून विशालच्या सुरक्षितेतचा विषय विशालच्या वकिलांनी वेळोवेळी न्यायालयासमोर उपस्थिती करून त्याला विशेष संरक्षणाची मागणी केली होती.

विशालवर एकूण आठ गु्न्हे दाखल होते. त्याच्या इतर तीन भावांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याने त्यांना पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांन ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. मृत बालिकेच्या कुटुंबीयांनी विशालच्या मृत्यूनंतर जसे क्रूर कृत्य त्याने केले होते, तशी त्याला शिक्षा मिळाली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. समाजाच्या विविध स्तरामधून विशालने केलेल्या कृत्याची त्याला शिक्षा मिळाली अशाच प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या. आम्हाला विशालच्या कुटुंबीयांना धोका असल्याची माहिती मृत बालिकेच्या कुटुंबीयांनी माध्यमांना दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशालने बालिकेची लैंगिक अत्याचार करून हत्या केल्यानंतर राज्यभर तीव्र संतापाची लाट उसळली होती. शासनाने याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन जलदगती न्यायालयात हा खटला चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्जवल निकम यांची विशेष वकील म्हणून नियुक्ती केली होती. या खटल्याच्या सुनावण्या सुरू झाल्या असतानाच विशालने आत्महत्या केली.