कल्याण – कल्याण पूर्व पश्चिम भाग जोडणाऱ्या वालधुनी उड्डाण पुलावर पालिका आणि वाहतूक विभागाने समन्वयाने उंच रोधक (हाईट बॅरिअर) लावले आहेत. या रोधकांमुळे पुलावरून होणारी अवजड वाहतूक कायमस्वरुपी बंद झाली आहे. यामुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसर, मुरबाड रस्ता, सुभाष चौक, वालधुनी पूल भागात होणारी वाहतूक कोंडीला पूर्ण विराम मिळणार आहे.

कल्याण पूर्व पश्चिम भाग जोडणाऱ्या वालधुनी उड्डाण पुलावरून उल्हासनगर शहर, कल्याण पूर्व, पश्चिमेत वाहतूक होते. कल्याण रेल्वे स्थानक भागातून येणारी प्रवासी वाहतुकीची वाहने याच पुलावरून धावतात. मागील अनेक वर्ष कल्याण शहरात मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या वालधुनी उल्हासनगर उड्डाण पुलावरून प्रवासी वाहतुकीबरोबर अवजड वाहतूक सुरू होती. या अवजड वाहतुकीमुळे दिवस, रात्र या पुलावर आणि पुलाच्या परिसरात वाहन कोंडी होत होती.

कल्याण शहर परिसरात बांधकामे अधिक प्रमाणात सुरू आहेत. कल्याण बाजारपेठेचे शहर आहे. दिवस, रात्र अवजड मालवाहू वाहने, सीमेंट मिश्रण वाहू वाहने, विविध प्रांतांमधून माल घेऊन येणारी वाहने वालधुनी उड्डाण पुलावरून धावत होती. ही अवजड वाहने वालधुनी उल्हासनगर उड्डाण पुलाच्या भागात आली की रिक्षा, मोटारी, दुचाकी वाहने, शहरांतर्गत वाहतुकीला मोठा अडथळा होत होता.

उल्हासनगर, कल्याण शहरातून सकाळच्या वेळेत कल्याण रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या आणि कामावरून परतणाऱ्या नोकरदार प्रवाशांना वालधुनी पुलावरील वाहन कोंडीचा दररोज त्रास सहन करावा लागत होता. मागील तीन वर्षापासून कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते विजय बोरे, रूपेश भोईर यांनी कल्याण डोंबिवली पालिका, वाहतूक विभागाकडे पाठपुुरावा करून वालधुनी उड्डाण पुलावरील अवजड वाहतूक बंद करावी यासाठी पाठपुरावा केला होता. या पुलावर उंच रोधक लावले तर ही वाहतूक आपोआप बंद होईल. त्यामुळे शहरांतर्गत प्रवास करणाऱ्या, नोकरदारांना दिलासा मिळेल, असे बोरे, भोईर यांनी पालिका, वाहतूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले होते.

मागील दोन वर्षापासून वालधुनी पूल नेहमीच वाहतूक कोंडीत अडकत होता. पावसाळा सुरू झाला की पुलावरील खड्ड्यांमुळे कोंडीत आणखी भर पडत होती. मागील काही महिन्यांपासून वालधुनी पुलावरील अवजड वाहनांची संख्या वाढू लागल्याने कोंडीत भर पडत होती. त्यामुळे पालिका आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुलाच्या सुभाष चौक, वालधुनी बाजूकडील दोन्ही प्रवेशव्दारांना उंच रोधक लावण्याचा निर्णय घेतला. या पुलावरून हलकी वाहने धावू लागल्याने स्थानिक प्रवासी, नोकरदार प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

अवजड वाहनांचा मार्ग

वालधुनी उल्हासनगर पूल अवजड वाहनांना बंद करण्यात आल्याने ही वाहने यापुढे शहाड उड्डाण पूल, प्रेम ऑटो, खडकपाडा, दुर्गाडी किल्ला, पत्रीपूलमार्गे उल्हासनगर किंवा इच्छित स्थळी जातील. प्रवासी बस पौर्णिमा चौक, संतोषी माता रस्ता, सहजानंद चौक, गुरुदेव हाॅटेलमार्गे बस आगारात येतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(कल्याणमधील वालधुनी उल्हासनगर उड्डाण पुलाला उंच रोधक.)