ठाणे – यंदा मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने ठाणे जिल्ह्यातील धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याचे चित्र असतानाही ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून पाणी टंचाईच्या समस्या जाणवत आहे. ऐन पावसाळ्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. धरण क्षेत्रातील पाणी साठा जून महिन्यापर्यंत पुरविण्यासाठी दरवर्षी जानेवारी ते मे महिन्यापर्यंत पाणी कपात लागू करण्यात येते.

यंदा मात्र ही कपात लागू करण्यात आली नसली तरी पाणी योजनेतील देखभाल आणि दुरुस्ती कामामुळे मात्र यंदा टंचाईची समस्या निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. शहरातील लोकसंख्येच्या मानाने पालिकेकडून होणारा पाणी पुरवठा अपुरा पडू लागला आहे. त्यातच शहरात नवनवीन इमारती उभ्या राहत असून या वाढत्या नागरिकरणामुळे पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर भागात पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

स्टेम प्राधिकरणाने अत्यावश्यक दुरुस्ती कामासाठी १८ ते १९ जून या कालावधीत पाणी पुरवठा बंद ठेवला होता. यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बंद होता. या बंदनंतर स्टेम प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा सुरळीत झाला असला तरी ठाणे शहरासह घोडबंदर भागाचा पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत. घोडबंदर भागातील संकुलांतील रहिवाशी टँकरने पाणी विकत घेत असून या खर्चाचा भार त्याच्या मासिक देखभाल व दुरुस्ती देयकात येत आहे. पालिकेच्या टँकरच्या दिवसाला २० ते २५ फेऱ्या तर, खासगी टँकरच्या ३० ते ३० फेऱ्या शहरात होत आहे.

पालिकेचे म्हणणे

ठाणे महापालिका स्वत:च्या योजनेतून महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. या योजनेसाठी महापालिका भातसा नदीच्या पात्रातून पाणी उचलते आणि त्याचा शहरात पुरवठा करते. यासाठी पालिकेने भातसा नदीच्या पात्रातील पिसे बंधाऱ्याजवळ पाणी उपसा करण्यासाठी पंप बसविलेले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील नदी पत्रात झाडांच्या पालापाचोळ्यासह इतर वाहून येणारा कचरा पाणी उपसा करणाऱ्या पंपाच्या मुखाशी अडकत आहे. यामुळे पालिकेला पुरेशा पाण्याचा उपसा करणे शक्य होत नसल्याने शहरात अपुरा पाणी पुरवठा होत आहे. यामुळेच गेल्या पाच दिवसांपासून शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे. येत्या एक ते दोन दिवसांत ही समस्या सुटेल, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.