कल्याण – कल्याण, डोंबिवली शहरांना कल्याण डोंबिवली पालिकेकडून पाणी पुरवठा करणाऱ्या नेतिवली, बारावे येथील जलशुध्दीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीची कामे करायची असल्याने कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी (ता.६ जून) रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद राहणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी दिली आहे.

हेही वाचा >>> महिन्यापासून शहापूर परिसरातून जीओचे नेटवर्क गायब, नागरिक त्रस्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जलशुध्दीकरण केंद्रांच्या या दुरुस्ती, देखभालीच्या कामांमुळे कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम आणि परिसराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी या जलशुध्दीकरण केंद्रांच्या दुरुस्तीची कामे केली जातात. त्याप्रमाणे ही कामे हाती घेतली जाणार आहेत. या जलशुध्दीकरण केंद्रातून होणाऱ्या मुख्य जलवाहिनी, पोहच जलवाहिनींवरील पाणी गळती थांबविण्याची कामे या कालावधीत केली जाणार आहेत, असे कार्यकारी अभियंता घोडे यांनी सांगितले. या कालावधीत यांंत्रिकी आणि तांंत्रिक दुरुस्तीचीही कामे केली जाणार आहेत. गुरुवारी दिवसभर दहा तास कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी या दोन्ही शहरांना कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.