उल्हासनगर: एकीकडे मोठ्या प्रमाणावर कर देऊन, पाणीपट्टी नियमित भरून लहान मोठ्या गृहसंकुलातील नागरिकांना पाण्यासाठी निवेदन, तक्रारींची सरबत्ती करावी लागते. तर त्याचवेळी दुसरीकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ केंद्रातून येणाऱ्या जलवाहिन्यांवर नेवाळी आणि आसपासच्या परिसरात सर्रास छिद्रे पडून पाणी चोरी केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रामाणिक नागरिकांची घागर रिकामीच राहत असल्याने संताप व्यक्त होतो आहे. तर चाळींकडून अमर्याद पाणी वापर सुरू आहे. याकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे सपशेल दुर्लक्ष होत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून पाणी सोडण्यात येते. पुढे हे पाणी उल्हास नदीत येऊन मिळते. त्यानंतर उल्हास नदीवर असलेल्या आपटी बंधाऱ्यावर एमआयडीसी प्रशासन पाणी उचलते. पुढे जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी प्रक्रिया केली जाते. येथून भव्य जलवाहिन्यातून हे पाणी विविध शहरांना पुरवले जाते. मात्र या जलवाहिन्या मोठा प्रवास करतात.

या प्रवासात या जलवाहिन्या अंबरनाथ, कल्याण, ठाणे तालुक्यातून प्रवास करतात. अंबरनाथ काटई रस्त्यावरून प्रामुख्याने या जलवाहिन्यांचा प्रवास होतो. या सर्व भागात जलवाहिन्यांच्या शेजारी मोठी नागरी वस्ती आहे. नेवाळी ते काटई रस्त्यावर नेवाळी, खोणी, धामटण, डावलपाडा अशी गावे लागतात. त्यात प्रामुख्याने चाळींचा समावेश आहे.

यातील बहुतांश चाळी अनधिकृत असून शासकीय जागांवर उभारण्यात आल्या आहेत. या चाळींना अधिकृत पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे राजकीय वरदहस्ताने चाळीच्या रहिवाशांनी एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिन्यांवर मोठ्या प्रमाणावर छिद्रे पाडून पाणी चोरी केली जाते आहे. त्यामुळे २४ तास पाणी या चाळींना मिळते. परिणामी पुढे ज्या शहरांना पाणी मिळते ते कमी दाबाने मिळते. मात्र त्याचवेळी चाळी अखंडित पाणी मिळवतात. काटई अंबरनाथ महामार्गावरील धामटण ते डावलपाडा या दरम्यान सर्वाधिक पाण्याची चोरी सुरू आहे.एमआयडीसीचे दुर्लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकीकडे मोठ्या जलवाहिन्यांना छिद्र पाडून सर्रास पाणी चोरी होत असताना त्यावर कारवाई होताना दिसत नाही. एमआयडीसी प्रशासन मात्र या मार्गावरील वाहन धुलाई दुकानांवर कारवाई करून स्वतःची पाठ थोपटून घेत असल्याचे दिसून आले आहे. राज्यात सत्तेत असलेल्या जिल्ह्यातील एका मोठ्या लोकप्रतिनिधीने काही दिवसांपूर्वी एका मोठ्या अधिकाऱ्याला याबाबत तक्रारही केली होती. मात्र त्यानंतरही या जलवाहिन्यातून बिनदिक्कतपणे पाणी चोरी सुरूच असल्याचे चित्र आहे.